गुहागर तालुक्यातील “वर्षावास” प्रवचन मालिका सांगता समारंभ उत्साहात संपन्न
बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जानवळे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम):
बौद्धजन सहकारी संघ, तालुका गुहागर आणि अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभ अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना, त्रिसरण-पंचशील ग्रहण आणि बुद्धपूजा पाठाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी “बुद्ध विहारांची निर्मिती कशासाठी?” या विषयावर अविनाश शिवराम कदम यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, चेअरमन एम. डी. मोहिते, उपाध्यक्ष अनिल सुर्वे, सरचिटणीस सुनील गमरे, सहचिटणीस दिलीप मोहिते, कोषाध्यक्ष वसंत कदम, विश्वस्त शंकर मोहिते, मनीष गमरे, पराग सावंत, धार्मिक संस्कार समिती अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुभाष जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी — वैभव गमरे (गुहागर), राकेश पवार (पेवे), मनोज गमरे (गिमवी), सुरेश जाधव (वेळंब), प्रभाकर मोहिते (पिंपर), सचिन पवार (शीर), विनोद यादव (कुडली) — आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपासक-उपासिका, बौद्ध बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अंतर्गत धार्मिक संस्कार समितीचे सचिव सुभाष जाधव यांनी केले.















