विशेष कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा
बंदी बांधवांमध्ये हक्क व संरक्षणाबाबत जागृती
रत्नागिरी : मानवी हक्क आयोग मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) डॉ. सुहास वारके तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक व उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग) योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनातून रत्नागिरी विशेष कारागृहातही हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बंदी बांधवांना त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांची, त्यांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाची आणि कारागृहातील विविध सुविधांची माहिती देणे हा होता.
कार्यक्रमाला प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी महिला व पुरुष बंदी बांधवांशी संवाद साधत मानवी हक्कांचे महत्त्व, कायदेशीर मदत मिळविण्याचे मार्ग आणि कारागृहातील सुधार प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.
विशेष कारागृहाचे प्रभारी अधीक्षक सचिन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कारागृहातील सर्व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी तसेच अधिकारी–कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.















