हर घर तिरंगा मोहीम पुन्हा जोमात! – रत्नागिरीत तीन टप्प्यांत उत्साहवर्धक उपक्रम राबविण्याचे निर्देश
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांचे विभागप्रमुखांना आदेश; 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्याने होणार कार्यक्रम

रत्नागिरी (जिमाका) – गेले तीन वर्ष लोकचळवळ बनलेली ‘हर घर तिरंगा’ मोहीम यावर्षीही उत्साहात राबवून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी विभागप्रमुखांना सूचनाही दिल्या.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रांताधिकारी व तहसीलदार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
अपर जिल्हाधिकारी गलांडे यांनी सांगितले की, शासनाच्या सूचनेनुसार पहिला टप्पा – 8 ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा – 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा – 13 ते 15 ऑगस्ट अशा तीन टप्प्यांत कार्यवाही होईल. सर्व विभागांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश त्यांनी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी आस्थापनांवर, अमृत सरोवर आणि वारसा स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल. यासोबतच ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत व जिल्हास्तरावर रॅली, प्रदर्शन, स्पर्धा, रोषणाई आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येतील. शाळा-महाविद्यालयांनी देशभक्तीपर उपक्रम राबवावेत, तर पोस्ट विभागाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी वेळेत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.
—
#हरघरतिरंगा #रत्नागिरी #स्वातंत्र्यदिन२०२५ #जिल्हाधिकारीकार्यालय #भाऊसाहेबगलांडे #देशभक्ती #राष्ट्रीयध्वज #महाराष्ट्रबातम्या
📸
















