मंडणगड तालुक्यातील कोन्हवली गावात वणव्यामुळे झाडे जळाली
शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली
तळवली (मंगेश जाधव) – मंडणगड तालुक्यातील कोन्हवली, पोस्ट. देव्हारे, जिल्हा रत्नागिरी येथे काही आठवड्यांपूर्वी लागलेल्या भीषण वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
काजू आणि आंबा बागांचे नुकसान
एप्रिल-मे हा काजू आणि आंबा उत्पादनाचा हंगाम असतो. शेतकरी वंदना दशरथ तांबे यांनी लावलेल्या काजू आणि आंबा बागांना या आगीत फटका बसला. तसेच अनेक इतर शेतकऱ्यांच्याही झाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे त्यांचे फळ उत्पादनाचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे.
प्रशासनाची पाहणी आणि पंचनामा
घटनेनंतर स्थानिक तलाठी सजा यांनी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून, अहवाल पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे.
शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
या वणव्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.