शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५ हजार पदांवर भरतीचा मार्ग मोकळा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५ हजार पदांवर भरतीचा मार्ग मोकळा

२१ वर्षांनंतर शिक्षकेतर भरती; कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदे नामनिर्देशनाने भरणार

 

पुणे : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशत: आणि पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, शिक्षक भरतीप्रमाणेच या पदांनाही रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेची अट लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५ हजार पदांवर भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

शालेय शिक्षण विभागाने या भरतीसंदर्भात सुधारित आकृतिबंधासह शासन निर्णय जाहीर केला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक या नियमित पदांचा समावेश असून, चतुर्थश्रेणी पदे रद्द करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत पदावर कायम राहतील.

 

शिक्षकेतर पदे रिक्त असल्याने ही कामे शिक्षकांवर येत होती आणि त्याचा अध्यापन व शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. त्यामुळे या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नियोजनपूर्वक भरती प्रक्रिया राबविण्याबाबतही सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

 

या पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देताना संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्य दिले जाणार आहे. १०० टक्के सरळसेवा पदभरती प्रक्रियेतही याचा समावेश असणार आहे. काही प्रकरणांत पदोन्नती प्रक्रियाही ५० टक्क्यांच्या मर्यादेत राबविण्यात येणार आहे. या सर्व भरती प्रक्रिया शासनमान्य पद्धतीने पार पाडण्यात आल्याची खातरजमा संबंधित उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक संघटना महामंडळाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी सांगितले की, राज्यात तब्बल २१ वर्षांनंतर शिक्षकेतर पदांवर भरती होत आहे. यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष करावा लागला. या भरतीमुळे शाळांतील प्रशासकीय कामकाज सुरळीत होईल, शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...