गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचा मानस
१५ जून २०२५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन
विरार – संदीप शेमणकर
विरार/नालासोपारा – समाज संघटन, युवक प्रबोधन आणि सांस्कृतिक जपणूक यासाठी कार्यरत असलेल्या गवळी समाज संघटनेचा तिसरा वर्धापन दिन दिनांक १५ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही संघटना सामाजिक सलोखा, युवा सशक्तीकरण आणि स्त्री-पुरुष समत्वासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सखुबाई भास्कर हॉल,मनवेल पाडा गाव, विरार (पूर्व) येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २ वाजता सत्यनारायण पूजनाने होणार आहे. धार्मिकतेच्या वातावरणानंतर मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा, तसेच गायन व नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, जे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.
कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे समाजातील १०वी, १२वी व पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, जिथे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढवले जाणार आहे. या कार्यक्रमात समाजातील विविध गुणी वक्ते आणि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महिलांसाठी खास उपक्रम जसे की हळदी कुंकू, संगीत खुर्ची, नशिबाचा कौल व प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. महिलांच्या सहभागातून समाजातील एकात्मता आणि संवाद वाढवण्याचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर भूषवणार आहेत. यावेळी विभागाचे आमदार राजन नाईक, युवा नेते व माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी स्थायी सभापती प्रशांत राऊत, तसेच इतर समाजप्रेमी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य सोहळ्याला गवळी समाज संघटनेच्या सर्व कार्यकारिणी मंडळातर्फे समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सामाजिक ऐक्याचा, नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि एकतेचा साक्षीदार ठरणार आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.