मराठीच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनसेला कडक इशारा
मीरा-भाईंदर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची तीव्र प्रतिक्रिया; भाषिक वादावर कायदेशीर कारवाईचा दिला इशारा.
मुंबई: राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच मुंबईतील मीरा-भाईंदर येथे मराठी बोलण्यावरून झालेल्या वादामुळे मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.
मीरा रोड येथील एका मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद झाला होता. या वादातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला, तर मनसेने आपली भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीचा वाद उफाळून आल्याने भाजप आणि मनसे आमनेसामने आले आहेत. दरम्यान, मनसेने याप्रकरणी मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”
फडणवीस यांनी पुढे म्हटले की, भाषेवरून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. “आम्ही मराठी आहोत आणि आम्हालाही मराठीचा अभिमान आहे, परंतु एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवसाय करतात आणि त्यापैकी अनेकांना तेथील स्थानिक भाषा येत नाही. मग त्यांच्याशीही अशाच प्रकारे वागणूक मिळाली, तर काय होईल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी जोर देऊन सांगितले की, “भारतात अशा प्रकारची गुंडगिरी योग्य नाही. जर कोणी अशी गुंडगिरी केली, तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. भाषेवरून कोणी मारहाण करत असेल, तर हे सहन केले जाणार नाही.” मीरा रोड घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढेही अशाप्रकारे भाषेवरून कोणी वाद निर्माण केला, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. भारतातील कोणत्याही भाषेवर अशाप्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले. त्यांनी मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात, मग हा कोणता विचार आहे?”
#मराठी #देवेंद्रफडणवीस #मनसे #भाषावाद #मीराभाईंदर #राजकीय #महाराष्ट्र #गुंडगिरी #पोलिसकारवाई #भाजप















