लढा अस्मितेचा….. लढा स्वाभिमानाचा....
मुंबई आपलीच! मराठी अस्मितेचा एल्गार आणि आताची जबाबदारी
???? मराठी भाषा आणि आपली प्राचीन संस्कृती टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरेबंधूंना तमाम महाराष्ट्राने साथ देऊया अन्यथा छत्रपतींचा इतिहास आम्हाला हिंदीमध्ये वाचावा लागेल.
???? एक दिवस मराठी मातीसाठी ????
मराठी माणसाच्या मनातली मुंबईची सल आणि तिचं महत्व किती खोलवर रुजलेलं आहे, हे आपण सारेच जाणतो. आजही, जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न येतो, तेव्हा मुंबई हे नाव अग्रस्थानी येतं. आज आपण केवळ मुंबईच्या भौतिक अस्तित्वाची नाही, तर तिच्याशी जोडलेल्या मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासाची गोष्ट करत आहोत.
१९६० ला जे जमलं नाही त्याचा बदला घेण्याची तयारी….
आपल्यापैकी अनेकांना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास आठवत असेल किंवा आपण तो ऐकला असेल. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांच्या निर्मितीचा विचार पुढे आला, तेव्हा मुंबईचा प्रश्न ऐरणीवर आला. १९६० पूर्वी, मराठी भाषिक विदर्भ प्रांत वगळून आणि गुजराती भाषिक राजकोटच्या उत्तरेकडील प्रांत वगळून ‘द्विभाषिक राज्य’ निर्माण करण्यात आलं होतं. नंतर भाषावार प्रांतरचना करताना, मुंबई कोणाला द्यायची – महाराष्ट्राला की गुजरातला? हा मोठा प्रश्न होता.
याच प्रश्नावर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी मोठी चळवळ सुरू झाली. या आंदोलनाने इतकं उग्र रूप धारण केलं की, मुंबईत प्रचंड मोर्चे निघू लागले. फ्लोरा फाउंटन चौकात पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, पण मराठी बांधवांनी जोरदार मुसंडी मारली. दुर्दैवाने, तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला. या अमानुष गोळीबारात १०५ मराठी मोर्चेकऱ्यांनी आपले प्राण गमावले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. आजही तो चौक हुतात्मा चौक म्हणून ओळखला जातो आणि तिथे हुतात्म्यांचे भव्य स्मारक उभे आहे, जे आपल्याला त्या बलिदानाची आठवण करून देतं.
या प्रचंड जनरोषामुळे मोरारजी देसाईंना हटवण्यात आलं आणि अखेर मुंबई महाराष्ट्रात विलीन झाली. पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की, मुंबई महाराष्ट्राला मिळाली याचा मोठा रोष आजही गुजराती जनतेच्या मनात आहे. महाराष्ट्राने मुंबईच्या बदल्यात गुजरातला तेव्हा ६० कोटी रुपये दिले, म्हणजेच आपल्या पूर्वजांनी मुंबई विकत घेतली आहे. त्यामुळे ती मराठी माणसाची आहे, यावर आपला ठाम विश्वास आहे.
शिवसेनेचा जन्म आणि मराठी अस्मितेची लढाई
मुंबई हातातून निसटल्याची ‘सल’ तेव्हापासून गुजराती जनतेच्या मनात आजही रुतून बसली आहे. मराठी जनतेचा आवाज बनून तिच्या हक्कांसाठी लढणारी एखादी संघटना असावी, हा विचार त्यावेळी प्रबळ झाला. बाळासाहेब ठाकरे या अभ्यासू आणि आक्रमक वक्त्याकडे या संघटनेचे नेतृत्व द्यावे हेही निश्चित झाले. आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी ‘शिवसेना’ स्थापन केली.
आजही, मुंबईवर ताबा मिळवण्यातील मोठा अडथळा ‘शिवसेना’ आहे, हे ओळखून शिवसेनेलाच मोडून काढण्याचा धूर्त राजकीय ‘डाव’ खेळला जात आहे, अशी अनेकांची भावना आहे. हा डाव समजून घेणे आणि त्याला प्रतिकार करणे, हे आज आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.
मराठी माणसाची एकी: काळाची गरज!
मराठी भाषेसाठी एक झालेले मनसे आणि शिवसेना हे राजकीय पक्ष म्हणून न पाहता, त्यांच्याकडे मराठी संघटना म्हणून पाहूया. श्री. राज ठाकरे यांच्याकडे अफाट वक्तृत्व आहे, लाखांच्या सभा घेण्याचं कौशल्य आहे, तर श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. या दोन्ही शक्तींनी एकत्रितपणे मराठी माणसाच्या हितासाठी उभं राहणं ही काळाची गरज आहे.
आज राज्यातील फडणवीस सरकार परप्रांतीय धार्जिणे असल्याचं चित्र दिसतंय. राज्यात आताच ‘जय गुजरात’चे नारे सुरू झाले आहेत, उद्या ‘जय यूपी बिहार’ही म्हणतील. मग येथील मराठी माणसाचं काय? आपण आज जर तटस्थ राहून बघ्याची भूमिका घेतली, तर १९६० ला मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी ज्या १०५ हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, ते आपल्याला माफ करतील का?
इतिहासात मराठे आपापसात जेवढे लढले तेवढे मुघलांशी लढले असते तर दिल्लीचेही तख्त मिळवले असते, हा इतिहास खोटा ठरवण्याची हीच ती मराठी माणसाची वेळ आहे. आपली एकी दाखवूया, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, आणि आपल्या हक्काच्या मुंबईसाठी एकजुटीने उभं राहूया!
जय महाराष्ट्र! जय मराठी!
बातमी साभार – प्रकाश पेंडसे ज्येष्ठ पत्रकार
संकलन – सुजेंद्र सुर्वे, संपादक – रत्नागिरी वार्ताहर















