💥💥 सुपर ओव्हरमध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय; निसांकाचे शतक व्यर्थ
अर्शदीपच्या अचूक गोलंदाजीमुळे आशिया कपमध्ये टीम इंडियाचा अपराजित विक्रम कायम
दुबई : आशिया कप 2025 मधील थरारक सामन्यात भारताने श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय विजय मिळवला. दोन्ही संघांनी 202 धावा केल्यानंतर सामना बरोबरीत सुटला होता. मात्र, सुपर ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने फक्त 2 धावा देत श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखले, तर भारताने पहिल्याच चेंडूवर 3 धावा काढून विजय निश्चित केला.
भारताच्या डावात अभिषेक शर्मा तडाखेबाज ठरला. त्याने फक्त 31 चेंडूंत 61 धावा झळकावल्या, ज्यात 8 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर संजू सॅमसन (23 चेंडूत 39 धावा, 3 षटकार) आणि तिलक वर्मा (34 चेंडूत नाबाद 49 धावा) यांनी महत्त्वाची भागीदारी करत भारताचा डाव उभा केला. शेवटी अक्षर पटेलने 15 चेंडूत नाबाद 21 धावा करत भारताचा स्कोर 202 वर नेला.
श्रीलंकेकडून पथुम निसांकाने दमदार शतक झळकावले. कुशल परेराने केवळ 32 चेंडूंत 58 धावांची फटकेबाजी केली. तर कर्णधार शनाकाने अखेरच्या षटकात जोरदार फटकेबाजी करत सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. मात्र निर्णायक क्षणी अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर लंकेचे फलंदाज निष्प्रभ ठरले.
या विजयानंतर भारताने आशिया कप 2025 मध्ये अपराजित राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवला आहे. श्रीलंकेचा अपराजित प्रवास मात्र थांबला आहे.
हॅशटॅग्स:
#AsiaCup2025 #INDvsSL #TeamIndia #CricketNews #BreakingNews #RatnagiriVartahar















