—
💥 पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दसरा मेळाव्यात शिंदेंची घोषणा; दिवाळीपूर्वी मदत मिळेल याची ग्वाही
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदेंनी पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. “पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल. हा एकनाथ शिंदे याचा शब्द आहे,” असे ते म्हणाले.
शिंदे म्हणाले की, “यंदा बळी राजा संकटात आहे. मराठवाडा आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना मीच सांगितले की, तुम्ही तेथेच थांबा आणि पूरग्रस्तांना मदत करा. याच कारणामुळे यंदाचा मेळावा मुंबई आणि ठाण्यापुरता मर्यादित ठेवला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली. “बाळासाहेब म्हणायचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करा. म्हणूनच संकटाच्या काळात आम्ही लोकांसोबत उभे आहोत. मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून वेदना झाल्याचे सांगत शिंदेंनी भावनिक भाषण केले. “अनेक वर्षात एवढा पाऊस कोणी पाहिला नाही. घरे पडली, शेती वाहून गेली. आता मदतीचा हात द्यायचा नाही तर कधी द्यायचा? पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी मदत नक्की मिळेल,” असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.
—
📌 हॅशटॅग
#एकनाथशिंदे #दसरा_मेळावा #शिवसेना #पूरग्रस्त #मराठवाडा #महाराष्ट्रराजकारण
—















