एस.टी. बसचा दरवाजा अचानक उघडला; बाहेर फेकल्या गेलेल्या तरुणीचा मृत्यू!
गुहागर-गणेशखिंड मार्गावर झालेल्या अपघातात दहिवली येथील प्रियंका कुंभार हिचे निधन; प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
📍गुहागर प्रतिनिधी:
गुहागर-गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एस.टी. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने बाहेर फेकल्या गेलेल्या प्रियंका विनोद कुंभार (वय ३५, रा. दहिवली-कुंभारवाडी) यांचे मंगळवारी (२१ ऑक्टोबर) निधन झाले.
अपघातानंतर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रियंका यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली जीवन-मृत्यूची झुंज अखेर गमावली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने दहिवली परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी प्रियंका कुंभार व सविता करंजेकर या गुहागर ते रत्नागिरी मार्गावरील एस.टी. बसने सावर्डे येथे जात होत्या. दहिवली खुर्द येथील आंबाफाटा थांब्यानंतर बस एका खड्ड्यात आदळली आणि आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला.
या धक्क्यामुळे प्रियंका कुंभार या थेट बसच्या बाहेर फेकल्या गेल्या. त्यांना डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली.
तातडीने त्यांना उपचारासाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात बसचालक आणि वाहक यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा आधीच दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी दहिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.
या अपघाती मृत्यूमुळे कुंभार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
















