कोकण किनारपट्टीला पुन्हा पावसाचा इशारा; मोंथा चक्रीवादळ व अरबी समुद्रातील कमी दाबामुळे ढगाळ वातावरण कायम!
मुंबईसह संपूर्ण कोकणात मध्यम पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
मुंबई ~अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासह कोकण किनारपट्टीवर पावसाचे इशारे कायम ठेवण्यात आले आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनाऱ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीला हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला असून, मच्छीमारांनी आपली बोटी धक्क्यावर सुरक्षित ठेवल्या आहेत.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्री आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले असून, त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकत असून, गुरुवारपर्यंत ते विदर्भाजवळ पोहोचेल, तर शुक्रवारी उत्तर भारताच्या दिशेने (यूपी, बिहार, सिक्कीम) सरकण्याचा अंदाज आहे.
या दोन प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र-गुजरात किनारपट्टीजवळ रेंगाळत आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत किनारी भागात पावसाचा जोर वाढेल.
मुंबईत गुरुवारी दिवसभर मध्यम पावसाची शक्यता असून, शुक्रवार आणि शनिवार या दिवशीही अधूनमधून पाऊस सुरू राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
#हवामानइशारा #कोकणपाऊस #मोंथा_चक्रीवादळ #अरबीसमुद्र #मुंबईपाऊस #रत्नागिरीवार्ताह
📸 फोटो
















