🚍 गुहागर परिवहन आगारला १५ नवीन बसेस व २० वाहक-चालक द्यावेत; काँग्रेस नेते आमदार भाई जगताप व माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांचा पाठपुरावा
गुहागर आगारातील बस व कर्मचारी टंचाईमुळे फेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्र्यांना निवेदन, समस्येवर तत्काळ तोडगा निघावा अशी काँग्रेसची मागणी.
गुहागर (सुजित सुर्वे)
गुहागर परिवहन आगारासाठी १५ नवीन बसेस तसेच २० नवीन वाहक व चालक उपलब्ध करून द्यावेत, अशी ठोस मागणी गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार श्री. प्रतापजी सरनाईक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गुहागर आगारातील बसांची कमतरता आणि कर्मचाऱ्यांची टंचाई यामुळे अनेक बसफेऱ्या रद्द होत असून, सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण, व्यावसायिक कारणांसाठी एस.टी. सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन गुहागर आगारची अडचण काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्री. भाई जगताप यांच्याकडेही माजी अध्यक्ष श्री. मिलिंद चाचे यांनी लेखी निवेदनाद्वारे मांडली. त्यानुसार आमदार भाई जगताप यांनी परिवहन मंत्री महोदयांना पत्र लिहून या प्रकरणात स्वतः लक्ष घालून गुहागर आगारला बस व कर्मचारी टंचाईतून मुक्त करावे, अशी विनंती केली आहे.
बसेसची संख्या अपुरी असल्याने अनेक मार्गांवरील गाड्या कमी कराव्या लागत आहेत किंवा फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यातच वाहक आणि चालक या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आगार व्यवस्थापनला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे हे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत असून, गुहागर आगाराची समस्या मार्गी लागेपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.















