संविधाना मुळेच समता, स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुतेचा अधिकार मिळाला – प्रितम रुके
दापोलीत संविधान दिन उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम)
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम लोकशाही व्यवस्थेचा पाया असून, त्याद्वारे सर्वसामान्य नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा अधिकार मिळाला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन (आठवले)पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी केले.
दापोली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, “संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशाची लोकशाही अधिक मजबूत बनली आहे. एक मताचा समान अधिकार या तत्वामुळे वंचित, पीडित, शोषित, महिला आणि बहुजन समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. संविधानाची जपणूक व संरक्षण करणे हे अखंड भारतीयांचे कर्तव्य आहे.”
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते अमर शांताई अर्जुन हजारे यांनी भारतीय संविधानाची प्रेरणादायी यात्रा आणि सामाजिक न्यायाची दिशा यावर मार्मिक विवेचन केले. त्यांनी संविधानातील मूल्ये फक्त वाचनापुरती राहू नयेत, ती आचरणात उतरली पाहिजेत, असे सांगत उपस्थितांना संदेश दिला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी केले तर सूत्रसंचालन दिनेश रुके यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा अहिल्या नगर कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल जाधव, किरण गमरे, संजय तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रदर्शन जितेंद्र जाधव यांनी मानले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे, शिवसेना तालुकाप्रमुख उमेश राजे, माजी समाजकल्याण सभापती भगवानजी घाडगे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला. दापोलीत लोकशाही मूल्यांची पुनर्र प्रतिज्ञा देणारा हा कार्यक्रम सर्वपक्षीय ऐक्याचे प्रतीक ठरला.















