भाट्ये समुद्रात पर्यटकांवर जीवघेणा प्रसंग; स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत वाचवले प्राण
रत्नागिरी : सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात जीवघेणा प्रसंग ओढवला. मात्र स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या धाडस, चपळाई आणि समयसुचकतेमुळे दोघांचे प्राण वाचले. रविवारी दुपारी साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजा तमन्ना मेत्रे (२२) आणि ऋषिकेश राजशेखर कोळी (२३, दोघेही रा. रविवार पेठ, शेळगी, जि. सोलापूर), हे रविवारी भाट्ये समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. दुपारी सुमारे १ वाजता ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. जवळपास दीड तास समुद्राच्या पाण्यात राहिल्यानंतर अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना दमछाक होऊ लागली आणि ते गटांगळ्या खाऊ लागले.
परिस्थिती गंभीर होताच दोघांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आर्त किंकाळ्या किनाऱ्यावर ऐकू येताच भाट्ये गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. किरण अशोक भाटकर यांनी तातडीने आपली ‘कृष्णा’ स्पीड बोट समुद्रात उतरवली. त्यांच्या सोबत पराग चंद्रकांत भास्कर, संचित प्रवीण भाटकर, आदित्य मिलिंद भाटकर आणि महेश नथुराम पिलणकर यांनीही बोटीतून खोल पाण्याकडे कूच केली.
काही मिनिटांच्या या श्वास रोखून धरणाऱ्या बचावकार्यात त्यांनी तेजा आणि ऋषिकेश या दोघांनाही सुरक्षितपणे बोटीत खेचून घेत किनाऱ्यावर आणले. वेळीच केलेल्या या बचावकार्यातील धाडसी भूमिकेमुळे दोघांचे प्राण थेट मृत्यूच्या दारातून परत फिरले.
दोघेही पर्यटक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून त्यांनी आपला जीव वाचवणाऱ्या सर्व तरुणांचे मनापासून आभार मानले आहेत.
रत्नागिरीतील समुद्रकिनारे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असतात. मात्र भरती-ओहोटीचा अंदाज, समुद्रातील प्रवाह, खोल पाण्याची मर्यादा आणि सुरक्षेचे नियम याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून पर्यटकांना नेहमीच सतर्क राहण्याचे, सूचनाफलक व सुचना पाळण्याचे आवाहन करण्यात येते. भाट्ये ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे मात्र सर्वत्र कौतुक होत असून, “समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेत स्थानिकांचा सहभाग किती महत्वाचा आहे याचे हे उत्तम उदाहरण” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.















