भास्कर जाधव यांना ‘मातोश्री’वरून समज? चिपळूणात ठाकरे गटात तणाव, राष्ट्रवादीच्या रमेश कदमांना पाठिंबा
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणात असतानाही आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे रमेश कदम यांना उघड पाठिंबा दिल्याने ठाकरे गटात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. मातोश्रीवरून जाधव यांना समज देण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे.
चिपळूण :-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून समोर आली आहे. ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार केल्यामुळे चिपळूणातील ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना चिपळूणमध्ये ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदासह २४ नगरसेवक पदांवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत.
अशा परिस्थितीतही भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार रमेश कदम यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला.
जाधव यांनी यावेळी असे स्पष्ट केले होते की,
स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून ते निवडणुकीतील तिढा सोडवण्यासाठी पुढे सरसावले. “मी शब्द दिला आहे, त्यामुळे परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांच्या पाठीशी उभा राहणार,” असे जाधव यांनी सांगितले. या विधानानंतर ठाकरे गटातील नाराजी अधिक तीव्र झाल्याचे समजते.
चिपळूणमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील विसंवाद मागील काही महिन्यांपासून दिसतच होता. या अंतर्गत कलहाचा विस्फोट मात्र आता चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. विनायक राऊत यांच्या दौऱ्यानंतरही जाधव यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.
पक्षातील या गंभीर स्थितीची माहिती थेट ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचली असून, उच्च पातळीवरून भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार,
> भास्कर जाधव यांना “पक्षाला नुकसान होईल असे पाऊल उचलू नका” असा सल्ला मातोश्रीवरून देण्यात आला आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी काल दिवसभर रमेश कदम यांच्या प्रचारासाठी चिपळूणातील मतदारसंघात विविध भेटी, बैठका आणि प्रचारफेऱ्या केल्या. आता मातोश्रीवरून समज दिल्यानंतर जाधव आपली भूमिका बदलतात की आपला निर्णय कायम ठेवतात, याकडे राजकीय वर्तुळांचे बारकाईने लक्ष लागले आहे.
—
✅















