पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे पुणे व परिसराच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. — :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक येत असून त्या दृष्टीने पुरंदर विमानतळ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे व परिसराच्या औद्योगिक विकासास गती मिळून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल.
पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा निर्णय शासन घेणार आहे. रेडीरेकनरनुसार नव्हे तर वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा दर निश्चित केला जाईल. एरोसिटी प्रकल्पात टीडीआरसह सर्व लाभ देण्यात येतील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत १०० टक्के प्राधान्य दिले जाईल तसेच युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून कुटुंबरचनेनुसार घरे व अतिरिक्त जागा दिली जाईल. अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना राबवण्याचा विचार शासन करत आहे. मोबदल्यासोबत पर्यायी जमीन देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
पुरंदर विमानतळ परिसरात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाईल. बागायती झाडांच्या दराबाबतही चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच राज्यातील सर्व प्रकल्पबाधितांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे.
या बैठकीस आमदार विजय शिवतारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















