पडवे–सैतवडे प्रवासी होडी वाहतूक बंद; वाढीव तिकीट दर व चालकाच्या मनमानीमुळे जनतेत तीव्र नाराजी, जयगड पोर्ट विभागाकडे तक्रार
पडवे. (सुजित सुर्वे ) –गुहागरतालुक्यातील पडवे- सैतवडे दरम्यानची प्रवासी होडी वाहतूक अचानक बंद झाल्याने प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे होडी वाहतूक बंद होण्यापूर्वीच अचानक वाढीव तिकीट दर आकारण्यात आल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता दर वाढवण्यात आल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पडवे येथून होडीने सैतवडे, खंडाळा, जाकादेवी तसेच पुढे कोल्हापूर व रत्नागिरीकडे जाण्यासाठी हा मार्ग नागरिकांसाठी अत्यंत सोयीस्कर होता. या मार्गामुळे वेळ, अंतर व खर्चाची बचत होत होती. मात्र होडी सेवा बंद झाल्याने आता प्रवाशांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नोकरदारांचे कामावर उशीर तर रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मार्गाने रत्नागिरी-कोल्हापूर कडे आरोग्य तपासणी करणारे सुद्धा प्रवास करत असतात
यासोबतच होडी चालकाच्या मनमानी कारभाराबाबतही प्रवासी नाराज होते. तिकीट दरात मनमानी वाढ, वेळापत्रकाचे पालन न करणे, प्रवाशांशी अरेरावीची वागणूक आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेण्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. मात्र याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवासी वर्ग करत आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवासी वर्गाने समधित विभाग आणि जयगड पोर्ट विभागाकडे तक्रार दाखल केली असून होडी सेवा तात्काळ पूर्ववत करावी, वाढीव तिकीट दर रद्द करावेत व चालकांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणावे, अशी ठाम मागणी केली आहे.
लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
मात्र पडवे ग्रामपंचायत याकडे का लक्ष डेट नाही. नागरीकाना का? त्रास सहन करावा लागतोय सदर ची या मार्गावरून होणारी प्रवासी होडी ची परवानगी जिल्हा परिषद कडून दिली जाते म्हणजेच ग्रामपंचायत सरपंच यानाही यात लक्ष घालणे आवश्यक आहे.अशी हि विचारणा प्रवासी वर्गा कडून होत आहे.














