योजना राबवायच्या कुणी? ग्रामसेवक महिन्यातून एक-दोन दिवसच गावात
वाटद-मिरवणे ग्रामपंचायत अद्याप स्वतंत्र ग्रामसेवकाविना
पी
रत्नागिरी:- निलेश रहाटे
साधारण साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या वाटद-मिरवणे महसूल ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये ग्रामपंचायतीत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या आधारे डिसेंबर 2024 मध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांना ग्रामपंचायत मार्फत लेखी पत्र देण्यात आले. मात्र आज जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा संबंधित प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
सध्या कार्यरत असलेला ग्रामसेवक आजून दोन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त भार सांभाळत असल्याने वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीसाठी आवश्यक वेळ देऊ शकत नाही. ग्रामसेवकाचा अधिकृत वार शुक्रवार असतानाही प्रत्यक्षात महिन्यातून एक-दोन वेळाच त्यांची उपस्थिती होत आहे. उर्वरित काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, चौकशी-सुनावणी व इतर कार्यालयीन कामांमुळे ग्रामसेवक गावात उपलब्ध नसतो.किंवा अतिरिक्त ग्रामपंचायत मीटिंग.
या परिस्थितीचा थेट परिणाम मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), हर घर जल / जल जीवन मिशन, ग्राम स्वराज, विविध डिजिटल उपक्रम तसेच इतर शासन योजनांच्या अंमलबजावणी वेळेत होत नाहीत. ग्रामसेवकाकडे पुरेसा वेळ नसल्याने लाभार्थी निवड, ऑनलाईन नोंदी, प्रस्ताव सादरीकरण, तपासणी व अनुदान प्रक्रिया वेळेवर होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
याशिवाय विकास कामांचे प्रस्ताव, ग्रामस्थांच्या अर्जांवरील निर्णय, माहिती अधिकाराच्या अर्जांवरील उत्तरे तसेच योजनांशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता यामध्येही मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. परिणामी ग्रामस्थ शासनाच्या योजनांपासून प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत आहेत.
एकीकडे शासन ग्रामस्वराज, डिजिटल पंचायत व सर्वसमावेशक ग्रामीण विकासाच्या घोषणा करत असताना, दुसरीकडे त्या प्रत्यक्षात राबवण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत प्रशासकीय यंत्रणा पुरवण्यात अपयश दिसून येत आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभा व ग्रामस्थांचा स्पष्ट ठराव असूनही स्वतंत्र ग्रामसेवक न देणे म्हणजे पारदर्शकतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
“ग्रामपंचायतीचा ठराव आणि अधिकृत पत्र असूनही जर वर्षभर निर्णय होत नसेल, तर ग्रामपंचायतींचे अधिकार व ग्रामस्थांचे हक्क काय उपयोगाचे?” असा थेट सवाल RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे व ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन स्वतंत्र ग्रामसेवक नियुक्त न केल्यास, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा RTI कार्यकर्त व पत्रकार निलेश रहाटे व गावातील जागृत ग्रामस्थांनी दिला आहे.
















