“प्रतिस्पर्ध्यांना मी कधीच कमी लेखत नाही” – निलेश सुर्वे
आबलोली (प्रतिनिधी : संदेश कदम)
गेली २४ वर्षे राजकारणात सक्रिय असताना राजकारणाबरोबरच समाजकारण करताना मी कधीही भेदभाव केला नाही. प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याची भूमिका माझी कधीच राहिलेली नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व पडवे पंचायत समिती गणातील उमेदवार निलेश सुर्वे यांनी केले.
गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निलेश सुर्वे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
सुर्वे म्हणाले की, “मी पडवे पंचायत समिती गणातून कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व आर.पी.आय. महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे. या गणातील मी स्थानिक उमेदवार असून एक-एक माणूस जोडत काम केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “या गणाच्या बाहेरील गावांमधूनही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पाचेरी सडा येथील पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आंबेकर मशाल चिन्हावर, तर मासू गावातील आनंद दादा भोजने कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मात्र माझे गाव पडवे पंचायत समिती गणातच असल्याने स्थानिक मतदारांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
आपल्यासमोरील आव्हानांबाबत बोलताना सुर्वे म्हणाले, “आव्हान शंभर टक्के आहे; मात्र हीच ताकद मला येथील स्थानिक मतदारांनी दिली आहे. नाटेकर साहेबांच्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरे जात असून गरज पडल्यावर मदतीला धावणारा, सतत जनतेत वावरणारा उमेदवार म्हणून मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे.”
ते पुढे म्हणाले, “५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पडवे गटातून महायुतीचे उमेदवार महेश दादा नाटेकर (धनुष्यबाण) आणि पंचायत समिती गणासाठी मी स्वतः कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. सर्व मतदार बंधू-भगिनींनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
🔸▶️ संपूर्ण मुलखात पाहण्यासाठी युट्यूब लिंक पहा 🔸
केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता असून त्याचा सकारात्मक परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसून येईल. महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वासही निलेश सुर्वे यांनी व्यक्त केला.















