दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
नवीमुंबई (मंगेश जाधव )
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दक्षिण मुंबईतील वरळी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून लाडू वाटप करण्यात आले. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत हा सोहळा मोठ्या हर्षोल्हासात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श निकाळजे (मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष, अखिल भारतीय असंघटित कामगार आणि कर्मचारी काँग्रेस, मुंबई) यांनी केले होते. यावेळी संतोष चव्हाण, फैजल अली, संदीप मोरे, संतोष गुप्ता, अशोक कांबळे, संदीप शिंदे तसेच गोरे विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात आंबेडकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जयंती सोहळ्याला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त करून दिले.














