तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम; विजय यांचे बहुमत अजूनही अधांतरी
११६ की ११८ आमदारांचा पाठिंबा? बनावट स्वाक्षरीच्या आरोपामुळे शपथविधी लांबणीवर
चेन्नई : तामिळनाडूमधील सत्तास्थापनेचा तिढा अधिकच गडद झाला असून अभिनेता-राजकारणी Vijay यांच्या नेतृत्वाखालील Tamilaga Vettri Kazhagam (TVK) पक्षाला अद्याप स्पष्ट बहुमत सिद्ध करता आलेले नाही. बहुमताचा दावा करत विजय यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेतली असली तरी राजभवनाकडून त्यांना पुन्हा रिकाम्या हाती परतावे लागले.
२३४ सदस्यांच्या विधानसभेत टीव्हीकेने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, विजय दोनपैकी एक जागा सोडणार असल्याने पक्षाचे संख्याबळ १०७ वर आले आहे. काँग्रेसचे ५, डाव्या पक्षांचे ४, तसेच आययूएमएल (IUML), व्हीसीके (VCK) आणि एएमएमकेच्या एका आमदाराच्या पाठिंब्यामुळे विजय यांनी ११७ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी राज्यपाल Rajendra Vishwanath Arlekar यांच्याकडे पाठिंबा पत्रेही सादर केली.
एएमएमके आमदाराच्या स्वाक्षरीवरून नवा वाद
दरम्यान, या दाव्यानंतर अवघ्या काही वेळातच T. T. V. Dhinakaran यांनी राज्यपालांशी संपर्क साधत मोठा गौप्यस्फोट केला. एएमएमकेच्या एकमेव आमदाराची स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर संबंधित आमदार कामराज यांच्यासह दिनकरण यांनी राजभवनात भेट देत टीव्हीकेवर घोडेबाजाराचा आरोप केला.
कामराज यांनी सादर केलेली स्वाक्षरी आपली नसल्याचे स्पष्ट केल्याने विजय यांचे संख्याबळ ११६ वर घसरल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, टीव्हीकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कामराज यांनी स्वतः पाठिंब्याचे पत्र लिहिल्याचा दावा केला आहे.
व्हीसीके आणि आययूएमएलनेही घेतली माघार
राजकीय समीकरणात आणखी ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा डीएमके आघाडीतील व्हीसीकेने अद्याप कोणतेही अधिकृत पाठिंबा पत्र दिले नसल्याचे स्पष्ट झाले. विजय यांनी वैयक्तिक संपर्क न साधता फक्त व्हॉट्सॲप संदेशाद्वारे पाठिंबा मागितल्याने व्हीसीकेने त्यांच्यावर “अहंकारी” असल्याची टीका केली.
त्याचबरोबर आययूएमएलनेही आपण डीएमकेसोबतच असल्याचे जाहीर करत विजय यांना कोणताही पाठिंबा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शपथविधी पुढे ढकलला
या सर्व घडामोडींमुळे शनिवारी सकाळी प्रस्तावित शपथविधी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विजय यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या सादर करेपर्यंत त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्यपालांनी घेतल्याचे समजते.
तामिळनाडूतील हे राजकीय नाट्य आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून पुढील काही तासांत सत्ता स्थापनेच्या समीकरणात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

















