राजापूर जवाहर चौक ते रानतळे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आठवड्याभरात सुरू करा, अन्यथा रस्ता बंद आंदोलन छेडण्यात येईल
राजापूरच्या माजी नगराध्यक्षांसह, नागरिकांचा नगर परिषदेला इशारा
राजापुर -( पुरुषोततम खांबल)
– राजापूर शहरातील राजापूर जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आठवड्याभरात सुरू करा अन्यथा रस्ता बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजापूरचे माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्यासह शहरातील नागरिकांनी आज राजापूर नगर परिषदेला दिला. तशा आशयाचे निवेदन सुद्धा नागरिकांनी आज सादर केले.
राजापूर जवाहर चौक ते रानतळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या मार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे ठरत आहे. या मार्गावरून रत्नागिरीला किंवा भू, कोतापुर, तेरवन, धाऊलवल्ली, नाटे या मार्गाकडे जाणाऱ्या लोक वाहने घेऊन जातात. राजापूर बुरुंबेवाडी ही बस सुद्धा याच मार्गावरून जाते. आधीच रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यात भरीत भर म्हणून मोबाईल कंपनीची केबल लाईन टाकण्याचे काम सुद्धा सुरू असून त्यासाठी सुद्धा खोदाई केली जात आहे. या मार्गावरून दुचाकीस्वारांना तर वाहन चालवणे मुश्किल ठरत आहे. यासंदर्भात आज राजापूर शहरातील नागरिक सूरज पेडणेकर, विवेक गुरव, अरविंद लांजेकर, शैबाज खलीफे, राजापूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे यांनी आज नगर परिषदेचे अधिकारी जितेंद्र जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी येत्या आठवडाभरात या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास सदर रस्ता अडवून रस्ता बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच दिला.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.