विशेष जनसुरक्षा अधिनियम मागे घ्यावा – महाराष्ट्र समविचारी मंचची मागणी

मुंबई – महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२५ हा कायदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंच आणि विविध जनसंघटनांनी केली आहे. या कायद्यामुळे जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येणार असून, सरकारविरोधात बोलण्याचे आणि टीका करण्याचे हक्क मर्यादित होतील, असा आरोप करण्यात आला आहे.
हा कायदा अस्तित्वात आल्यास कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनांना शासनाविरोधात भूमिका घेता येणार नाही. तसेच शासनाला अमर्यादित अधिकार मिळणार असल्याने, हा कायदा लोकशाही विरोधी असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे. हरकती, सूचना आणि सुधारणा नोंदवण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२५ होती. त्याआधी महाराष्ट्र समविचारी मंच या शासकीय नोंदणीकृत संघटनेनेही आपली हरकत नोंदवली आहे.
महाराष्ट्र समविचारी मंचचे कार्याध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी, मुंबईचे मुख्य समन्वयक विवेकराव मोरे, पुण्याचे निमंत्रक अमित मराठे, रत्नागिरीतील मनोहर गुरव आणि रघुनंदन भडेकर यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला आहे. तसेच, मंचाचे संस्थापक बाबा ढोल्ये आणि राज्य युवा अध्यक्ष निलेश आखाडे यांनी या कायद्याच्या विरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे.
याबाबत आतापर्यंत महाराष्ट्रभर २०० पेक्षा जास्त जनसंघटनांनी आणि २०,००० हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन निवेदने सरकारला सादर केली आहेत. पत्रकार संघटनांसह शिक्षक आणि प्राध्यापक संघटनांनीही या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. हा कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी या सर्व गटांकडून करण्यात येत आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators