आ. रा. स. अकॅडमीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा! संपन्न
“जो विद्यार्थी आ.रा.स. ला जोडला जातो तो यशस्वी होतोच” – ॲड. राकेश सत्वे यांचे प्रतिपादन
आबलोली (संदेश कदम) – कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे; त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द दिल्यास ‘आ. रा. स. अकॅडमी’ त्यांच्या पंखात बळ देऊन यशाचा मार्ग दाखवेल. ‘जो विद्यार्थी आ. रा. स. अकॅडमीला जोडला जातो, तो यशस्वी होतोच,’ असे ठाम मत आ. रा. स. अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक ॲड. राकेश सत्वे यांनी व्यक्त केले.
गुहागर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित ‘आ. रा. स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन ॲन्ड करिअर’ (निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र) चा उद्घाटन सोहळा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून लोकशिक्षण मंडळ आबलोली शैक्षणिक संकुल, खोडदे, गोणबरेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ॲड. राकेश सत्वे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
‘ही सेवा नाही, ही चळवळ आहे!’
ॲड. सत्वे पुढे म्हणाले की, “आपल्यातील ‘ॲटीटूड’ हा स्वप्नांसाठी बाळगा, हुल्लडबाजीसाठी नाही. स्वतःसाठी आणि आपल्या आई-वडिलांसाठी जगा. प्रयत्नांची चिकाटी कायम ठेवा. पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठे होण्याची संधी सचिनशेठ बाईत यांनी दिली आहे, त्या संधीचे सोने करा. कोकणात स्पर्धा परीक्षांचे वादळ निर्माण झाले पाहिजे. ही केवळ सेवा नाही, तर ही एक चळवळ आहे आणि ती आपण गुहागर तालुक्यात नक्कीच उभी करू.” यावेळी त्यांनी साडवली येथे अनाथ ५० मुलांसाठी अकॅडमी उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही केली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
याप्रसंगी डायटचे माजी प्राचार्य नेताजी कुंभार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “अकॅडमी सुरू करण्याचा हा योग्य निर्णय आहे. लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत यांच्या रूपाने ही अकॅडमी उभी राहत आहे, जी प्रेरणा आणि दिशा देण्याचे काम करेल. अपयश येणे हा गुन्हा नाही, पण कमी ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे; त्यामुळे नकारात्मक भूमिका झिटकारा.”
माजी डी.वाय.एस.पी. विलास भोसले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “तुमचे भविष्य तुम्हाला साद घालत आहे. आ. रा. स. अकॅडमीची विद्यार्थ्यांना पुढे आणण्याची तळमळ आहे. स्वप्ने नेहमी मोठी बघा, तुम्हाला काय व्हायचे आहे, ते तुम्ही ठरवा, स्वतःला कमी लेखू नका. अडचणी आल्या तरी ध्येयापासून हटू नका. प्रयत्न चालू ठेवा. परिस्थिती तुम्हाला वाकवू शकत नाही, तुम्ही परिस्थितीला वाकवू शकता. तुमच्या पुढ्यात ताट वाढले आहे, त्यातील अन्न कसे खायचे ते तुम्ही ठरवा.”
रेल्वे पोलीस एस. एम. कोरे यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, “तुम्ही कॉलेज करत असतानाच अकॅडमी जॉईन करा. १० वी, १२ वी बोर्डात कोकण नेहमी पुढे असते, पण १२ वी नंतरच्या प्रवासाला उपयुक्त प्लॅटफॉर्म मिळत नाही. म्हणून आ. रा. स. अकॅडमी हा उत्तम पर्याय आहे. मी आ. रा. स. परिवारासोबत तीन वर्षे आहे; त्यामुळे तुम्हीही स्वतःचे आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही संधी निर्माण करा.”
यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी सचिनशेठ बाईत, आ. रा. स. अकॅडमीचे संस्थापक, संचालक ॲड. राकेश सत्वे, डायटचे माजी प्राचार्य नेताजी कुंभार, माजी डी.वाय.एस.पी. विलास भोसले, रेल्वे पोलीस एस. एम. कोरे, खोडदे गावच्या सरपंच कु. पूजा गुरव, आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, पोलीस पाटील सौ. श्रद्धा गोणबरे, सौ. योगिता पवार, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, मुख्याध्यापक डी. डी. गिरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे सीईओ अविनाश कदम, सचिव राकेश साळवी, संचालक अनंत पागडे, सूर्यकांत बाईत, सौ. नेत्रा रहाटे, सौ. सुषमा उकार्डे, दिनेश नेटके, अजित रेपाळ, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, रविंद्र निवाते आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राजमाने यांनी केले तर संदिप महाडिक यांनी सर्वांचे आभार मानले.
#ARSacademy #RakeshSatve #गुहागर #Abololi #स्पर्धापरीक्षा #CareerGuidance #Success #CompetitiveExams #Education #Maharashtra #लोकशिक्षणमंडळ #ग्रामविकास #StudentSuccess #Inspiration #YouthEmpow
erment #कोकण
















