श्रीरामपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी आत्मदहनाचा इशारा: मनोज काळे यांचा निर्धार!
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी: नंदकुमार बगाडे
श्रीरामपूर, १४ जुलै]: श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, या गेल्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस मनोज काळे यांनी मोठा पवित्रा घेतला आहे. जर येत्या १० दिवसांत पुतळ्याचे काम सुरू झाले नाही, तर येत्या शुक्रवार, १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगरपालिकेसमोर आत्मदहन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
मनोज काळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याप्रमाणेच भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी मागणी केली आहे. श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील दलित व इतर समाजाकडूनही ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीसाठी यापूर्वी आरपीआयच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेसमोर भव्य मोर्चाही काढण्यात आला होता, ज्यात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोज काळे यांनी यापूर्वी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते, मात्र त्यावेळी त्यांना केवळ ‘पोकळ आश्वासने’ मिळाल्याचे ते म्हणाले. नाशिक येथे डॉ. आंबेडकरांचा पुतळा तयार असून, त्यासाठी १५ लाख रुपयेही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या पुतळ्याचे दरमहा भाडेही भरले जात आहे, तरीही पुतळा बसवण्यासाठी होणारा विलंब अनाकलनीय आहे, असे काळे यांनी नमूद केले.
श्रीरामपूर शहर व तालुका हे भारत देशाचे संविधान जनक आणि कायदेपंडित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, असे सांगत, या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्यास विलंब का होत आहे, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे. शहरातील व तालुक्यातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून तो मार्गी लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नसून, ते सर्व जाती-धर्मांचे आहेत, मग यावर सर्व गप्प का, असा सवालही त्यांनी केला.
मनोज काळे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्या जीवितास काही धोका झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर राहील.
या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज काळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी राज्य शासनाकडे लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, काळे यांनी केवळ आश्वासने नको, तर पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
या आंदोलनाला आरपीआयचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट, उपाध्यक्ष युवक राजेंद्र मगर, शहराध्यक्ष विजय पवार, मातंग एकता आघाडी आरपीआय नेते संजय बोरगे, तालुका संघटक सुभाष त्रिभवन, जिल्हा कार्याध्यक्ष राजू गायकवाड, जिल्हा संघटक सुरेश जगताप, तालुका कार्याध्यक्ष संदिप शेळके, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, युवक नेते अमित काळे, रितेश येडके, महेंद्र साळवी यांच्यासह समाधान नरोडे, अक्षय पवार, अमोल काळे, निलेश विनायक बोरोडे, भारत शिंगवी, पप्पू भोसले, रोहित भारस्कर, अकबर पठाण, यशवंतराव गायकवाड, प्रशांत साळवे, अनिल मोरगे, अविनाश आंबोली, सम्राट जिने, संजय साबळे आदी असंख्य कार्यकर्त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज काळे आणि त्यांच्या संघटनेच्या प्रयत्नांचे अभिनंदन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. श्रीरामपूरकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
#DrAmbedkarStatue #Shrirampur #Protest #ManojKale #RPI #नगरपालिका #आत्मदहन #BabasahebAmbedkar #Ahilyanagar #MaharashtraNews #DemandForJustice #सोशलजस्टिस #Poli
ticalUpdate













