📰 निवडणुका पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांचा संताप : “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला”

मुंबई ~राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका न्यायालयीन वादामुळे निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. गेल्या पंधरवड्यापासून जिथे प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू होती, तिथे अचानक आलेल्या या निर्णयामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आहे. निवडणूक आयोगाने नवीन कार्यक्रम जाहीर केला असून, स्थगित केलेल्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होईल. तर उर्वरित ठिकाणची मतदान प्रक्रिया 2 डिसेंबरला नियोजित वेळेनुसारच पार पडणार आहे.
या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कोणता कायदा आयोग काढतोय ते मला माहित नाही. माझ्या माहितीनुसार अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. उद्या निवडणुका आणि आज स्थगिती — हे पूर्णपणे चुकीचं आहे. अनेक उमेदवारांची मेहनत वाया गेली. आयोग स्वायत्त असला तरी असे निर्णय घेणे योग्य नाही. याबाबत आम्ही आयोगाकडे रिप्रेझेंटेशन देणार आहोत.”
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा पुढील टप्पा सुरू झाला आहे. काही ठिकाणी संपूर्ण संस्थांची तर काही ठिकाणी केवळ प्रभागांची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबरला होणार आहे. निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील.
सदस्यपद किंवा अध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात दाखल याचिकांमुळे निवडणूक आयोगाने काही प्रभागांतील निवडणुका स्थगित केल्या आहेत.
अर्जांवरील आक्षेपांवरील विलंब, अर्ज मागे घेण्यासाठी मर्यादित वेळ आणि याच दरम्यान उमेदवारांना वितरित झालेली चिन्हे — या कारणांमुळे आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.
यानुसार, 2 डिसेंबरऐवजी काही ठिकाणच्या निवडणुका आता 20 डिसेंबरला पार पडणार आहेत.
















