साधू-संतांनाही वृक्षतोड पटेल का? तपोवन प्रकरणावर सयाजी शिंदेंचा थेट सवाल
नाशिक │ आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामसाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीविरोधात आंदोलन तीव्र होत आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना, राजकीय नेते यांच्यासोबत आता अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या निर्णयावर कठोर टीका केली आहे. “ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी हे पटेल का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
1,800 झाडांच्या तोडीवरून संताप
तपोवन परिसरात १,१५० एकरांवर साधुग्राम उभारण्यासाठी जवळपास १,८०० झाडांची कत्तल सुरू आहे. या वृक्षतोडीविरोधात नाशिककर, वृक्षमित्र आणि विविध संघटना आक्रमक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना देखील या निर्णयाविरोधात जाहीर निषेध आंदोलन करणार असून, 6 डिसेंबर रोजी संभाजीनगर रोडवरील तपोवन कमानीजवळ कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सयाजी शिंदे यांचा रोखठोक सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले,
“साधू आले-गेले काही फरक पडत नाही. पण झाडं गेली तर सगळंच संपतं.”
“१० वर्षांची झाडं तोडून दुसरीकडे १० झाडं लावायची ही कल्पना म्हणजे पोरांना मारून आई-वडिलांना जिवंत ठेवण्यासारखी आहे.”
“झाडं म्हणजे आपली आई-बाप आहेत. आपल्या आई-वडिलांवर हल्ला झाला तर आपण गप्प बसू का?”
ते पुढे म्हणाले की, ऋषी-मुनी झाडाखाली राहून तपश्चर्या करत. मग आज साधू-संतांना झाडं तोडून तयार केलेल्या जागेत राहणं कसं पटेल, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजकीय वादालाही ऊत
वृक्षतोड प्रकरणानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, शिंदे यांनी “मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही” असे सांगत प्रतिक्रिया न देण्याचं स्पष्ट केलं.
वृक्षरक्षणाचा आवाज अधिक बुलंद
तपोवनातील वृक्षतोडीला विरोधाचा स्वर प्रखर होत असून, नागरिकांचा सहभाग वाढू लागला आहे. पर्यावरणवादी संघटना, स्थानिक कलाकार आणि नाशिकमधील नागरिक मिळून या आंदोलानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
—














