धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या जागतिक दर्जाच्या विकासाला मंजुरी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन परिसरातील मंत्री परिषद सभागृहात आज शिखर समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील बलिदान स्थळाचा आणि वढू बुद्रुक येथील समाधी स्थळाचा सुधारित विकास आराखडा अंतिम मंजूर करण्यात आला.
राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि त्यागाचा गौरव करण्यासाठी जागतिक दर्जाचे प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भावी पिढ्यांपर्यंत महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास प्रभावीपणे पोहोचवणे, ही या योजनेची मुख्य भूमिका असणार आहे.
सुधारित विकास आराखड्यातील महत्त्वाची कामे :
तुळापूर–आपटी भीमा नदीवरील पुलाचे बांधकाम
आपटी–वढू (बु.) रस्त्याचे रुंदीकरण
तुळापूर बलिदान स्थळी अत्याधुनिक संग्रहालय
82 आसनी क्षमता असलेले 10D शो सभागृह
प्रशासकीय इमारत, ग्रंथालय व स्मरणिका दुकाने
आकर्षक प्रवेशद्वार व 350 मीटर नदी घाट
वाहनतळ, शौचालय व उपहारगृह सुविधा
वढू बुद्रुक समाधी स्थळ विकास :
संग्रहालय व प्रशासकीय इमारत
स्मरणिका दुकाने आणि प्रवेशद्वार
120 मीटर लांबीचा नदी घाट
वाहनतळ, शौचालय व उपहारगृह
भीमा नदीवरील पुलावर 12 मीटर रुंदीची ‘विव्हिंग गॅलरी’
तुळापूर व वढू बुद्रुक येथे 100 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके, मुख्य सचिव तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे इतिहासप्रेमी, पर्यटक आणि अभ्यासकांसाठी तुळापूर व वढू बुद्रुक परिसर जागतिक आकर्षणकेंद्र ठरणार आहे.















