लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष
नवीमुंबई (मंगेश जाधव)बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा नेता” अशा घोषणांनी बुधवारी लोढाहेवन-निळजे परिसर दुमदुमून गेला. कारण होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे या शहरातील पहिले आगमन. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७११, पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवात त्यांचे भव्य व जंगी स्वागत करण्यात आले.
तीन दिवसांचा प्रेरणादायी महोत्सव :
१४ ते १६ एप्रिल दरम्यान चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव २०२६ विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा झाला. व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमांनी लोढाहेवन परिसराला उत्सवाचे स्वरूप आले होते.
‘आनंदराजच दिशा देतील’ – जनतेचा विश्वास :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिल, बौद्धजन पंचायत समिती व पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांसारख्या संस्थांवर आपल्या नेतृत्वाने हक्क मिळवत “आम्ही फक्त रक्ताचे नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांचेही वारसदार आहोत” हे कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळेच ‘आनंदराज आंबेडकरच आज आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देऊन मुख्य प्रवाहात आणू शकतात’ अशी ठाम भावना कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
ज्वलंत प्रश्नांवर परखड भूमिका :
जाहीर सभेला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत परखड भाष्य केले. इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा दाखला देत ते म्हणाले, “इराणसारखा छोटा देशही बलाढ्य अमेरिकेला कडवी झुंज देतोय, हे लक्षात घ्या.” त्याचवेळी वरळीतील भीम जयंतीला विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या स्पष्ट व निर्भीड वक्तृत्वाने उपस्थितांमध्ये चैतन्य संचारले.
मान्यवर व कार्यकर्त्यांचा सहभाग :
यावेळी समाजभूषण भगवान साळवी, रिपब्लिकन सेना कल्याण-डोंबिवली ग्रामीण २७ गावचे अध्यक्ष अनंत पारदुले, सचिव समाधान वानखडे, आनंद मोहन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आयोजक संस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
आनंदराज आंबेडकर यांच्या पहिल्या भेटीने लोढाहेवन-निळजे परिसरातील आंबेडकरी चळवळ अधिक बळकट झाली असून, नव्या पिढीमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे.
















