‘सूर्यघर’ योजनेत देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
‘सूर्यघर’ योजनेत देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत आतापर्यंत 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे. त्यापैकी 1,92,936 प्रकल्प महाराष्ट्राने पूर्ण करून देशात दुसरे स्थान मिळवले आहे. 2026-27 पर्यंत ही योजना 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र भविष्यातही या योजनेत महत्त्वपूर्ण योगदान देईल.”
सौरऊर्जेच्या प्रगतीत महाराष्ट्र आघाडीवर
13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सूर्यघर योजना’ सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील एक कोटी घरांना रुफटॉप सोलर सिस्टिमद्वारे 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा मानस आहे.
या योजनेसाठी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना 60% सबसिडी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. तसेच, या योजनेमुळे भारताचा नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवरील भर वाढेल आणि वीज बचतीस चालना मिळेल.
देशभरात 10 मार्च 2025 पर्यंत 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.