अंमली पदार्थांविरोधात कठोर पावले – जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंमली पदार्थांविरोधात कठोर पावले – जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक

banner

रत्नागिरी: जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रशासन अधिक सक्रिय होत असून, जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी कस्टम, उत्पादन शुल्क, कोस्ट गार्ड, पोलीस आदी विभागांना समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, जेट्टींवर येणाऱ्या परदेशी नौकांवर देखील विशेष लक्ष ठेवावे आणि त्यांची तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले.

प्रमुख निर्देश:
व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव तयार करावा.
शाळांमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी.
बंदरांवर येणाऱ्या परदेशी नौकांची कसून तपासणी करावी.
बंद कंपन्यांची तपासणी करून अहवाल सादर करावा – एमआयडीसी अधिकाऱ्यांना सूचना.
रात्री उघड्या असणाऱ्या मेडिकल दुकाने तपासावी – अन्न व औषध प्रशासनाला निर्देश.
तडीपारी प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत – उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश.

नेपाळी खलाशांवर विशेष लक्ष
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बंदर क्षेत्रात नेपाळी खलाशांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बंदर अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पोलीस विभागातील प्रशिक्षित श्वानांचा वापर करून संशयितांची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी बैठकीत विषय सादर केला. तसेच, दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

कडक कारवाईसाठी सर्व विभाग सज्ज
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आदेश दिले की, सर्व विभागांनी एकत्र येऊन अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करावी. अंमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी लढा देण्यासाठी संयुक्त रणनीती आखण्यात येणार असून, संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात.

(— विशेष प्रतिनिधी, रत्नागिरी)

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...