ताजे, स्वच्छ, निर्भेळ व दर्जेदार अन्नासाठी तपासणी मोहीम राबवा – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, – रत्नागिरी हा महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यांना ताजे, स्वच्छ, निर्भेळ आणि दर्जेदार अन्न पदार्थ मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभरात व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि नियम व नियमन 2011’ अंतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल, उपहारगृह, मिठाई आस्थापना आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करणे गरजेचे आहे. बस स्थानक परिसर आणि रस्त्यांलगत अन्न विक्री करणाऱ्या केंद्रांचीही तपासणी केली जावी. तसेच, दंडात्मक कारवाई वाढवून परिसराच्या स्वच्छतेवर भर द्यावा. अन्न नोंदणी परवान्यांसाठीही प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करावे.
तपासणी अहवाल आणि कारवाई सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी बैठकीत तपासणी मोहिमेचा अहवाल सादर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार:
एकूण 309 अन्न नमुने तपासण्यात आले, त्यापैकी 5 अप्रमाणित आढळले.
अन्न परवाना आणि नोंदणीसाठी 5,458 अर्ज प्राप्त झाले, त्यातील 4,567 अर्ज निकाली काढण्यात आले.
अर्जांच्या शुल्काद्वारे 1 कोटी 5 लाख 15 हजार 900 रुपये जमा.
अन्न परवान्यांसाठी 90 ठिकाणी तपासणी; 6 जणांवर निलंबनाची कारवाई.
नोंदणी तपासणीसाठी 39 ठिकाणी पाहणी; 1 ठिकाणी निलंबन.
प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री प्रकरणी 4 एफआयआर दाखल, 2 वाहने जप्त.
6 लाख 77 हजार 160 रुपये किमतीचा साठा जप्त.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.