राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई: राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्कता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यलो अलर्ट असलेले जिल्हे:
➡️ ३१ मार्च २०२५: पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली
➡️ १ एप्रिल २०२५: ठाणे, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम
कोकणातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून उष्णतेचा कडाका जाणवत आहे. कोकणातील आंबा, काजू, कडधान्ये आणि सुपारी यांसारखी उत्पादने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वीज, वादळी वारे आणि मुसळधार पावसापासून स्वतः आणि जनावरांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. अवकाळी पावसामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.