साटवली येथे शेतकऱ्यांना फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचे वाटप.
लांजा – ( जितेन्द्र चव्हाण) तालुक्यातील साटवली येथे तालुका कृषी विभागामार्फत सिंधूरत्न योजनेअंतर्गत साटवली येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आज शनिवारी फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचे वाटप करण्यात आले.

फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा पिकाचे 25 ते 30 टक्के नुकसान होत असल्यामुळे लांजा तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. म्हणूनच फळमाशी नियंत्रणासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून रक्षक सापळ्यांचे वाटप केले जात आहे.
फळमाशी फळांच्या साळी खाली अंडी घालते. दोन ते ती दिवसात अंडी उगवून आळ्या फळातील घर खातात. किडलेली फळे गळून पडतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाऊन आर्थिक नुकसान होत आहे. या किडीची अळी अवस्था ही जास्त नुकसानकारक असते व याचा प्रादुर्भाव फळांच्या सालीच्या आत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कीटकनाशक पोहोचत नाहीत त्यामुळे फवारणीमुळे नियंत्रण न करता त्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर प्रभावी ठरतो.
सदरचे नुकसान नियंत्रण करण्याकरिता प्रतिहेक्टरी ०४ रक्षक सापळे वेगवेगळे ठिकाणी बागेत लावण्याची शिफारस केली आहे. रक्षक सापळ्यांमध्ये फळमाशींच्या नरांना आकर्षित करणारा मिथाईलं युजीनाँल नावाचा कामगंध वापरला जातो. हा काम गंध कापसाच्या बोळ्याला लावून रक्षक सापळ्यामध्ये ठेवला जातो. या कामगंधामुळे आंबा बागेमध्ये असलेले फळमाशीचे नर सापळ्यांकडे आकर्षित होतात व त्यामध्ये अडकून मरतात. त्यामुळे फळमाशीचे पुढील प्रजोत्पादन थांबते व फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो.
या पार्श्वभूमीवर साठवली ग्रामपंचायत येथे फळमाशी रक्षक सापळे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सेवक श्रीम. जे. के. झाटे, आर. एस. साळुंखे, ए .ए.सावंत व शेतकरी उपस्थित होते.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.