‘नो कॉम्प्रोमाईझ’; रत्नागिरी अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांचा सक्त आदेश
अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश; पोलिसांसह माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे
रत्नागिरी: “अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करावयाचा आहे, त्यासाठी कोणताही कॉम्प्रोमाईझ नको,” अशा शब्दांत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, “या समाजविघातक मोहिमेत माध्यमांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. अंमली पदार्थाचे सेवन करणारा आणि विकणारा दोघेही दोषी आहेत. त्यांच्या विरोधात एकसमान कारवाई होईल. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील.”
डॉ. सामंत यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “कोणाचाही फोन आला आणि तो आरोपींना वाचवण्यासंबंधी असेल, तर पोलिसांनी त्याची नोंद डायरीमध्ये करावी. तसेच अशा व्यक्तींची नावे माध्यमांना द्यावीत. अंमली पदार्थाचे हे लोण कधी आपल्या घरातही पोहोचू शकते, याचे भान सर्वांनी ठेवावे.”
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी 2024-25 मध्ये झालेल्या कारवायांची माहिती दिली.
2024 मध्ये 25 गुन्ह्यांमध्ये 39 आरोपी अटकेत असून, लाखोंच्या किंमतीचा ब्राऊन शुगर, गांजा व चरस जप्त करण्यात आला.
2025 मध्ये आतापर्यंत 6 गुन्ह्यांमध्ये 11 आरोपींना अटक झाली असून 7 आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
राज्यात ‘रत्नागिरी पॅटर्न’ म्हणून अंमली पदार्थविरोधी मोहीम आदर्श ठरेल, अशी अपेक्षा डॉ. सामंत यांनी व्यक्त केली.
हॅशटॅग्स:
#RatnagiriNews #UdaySamant #DrugsFreeDistrict #NoCompromise #MaharashtraPolice #YouthAwareness #AntiDrugsCampaign #BreakingNews















