हिवताप व हत्तीपाय विभाग हस्तांतरणाच्या विरोधात कर्मचारी आंदोलन! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे न्यायाची मागणी
राज्यातील १२ हजारांहून अधिक कर्मचारी अन्यायाच्या निर्णयाविरोधात आक्रमक; संघर्ष समितीची उपमुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा
मुंबई महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेले हिवताप व हत्तीपाय विभागातील तब्बल १२,००० कर्मचारी गेली अनेक दशके मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया, हत्तीरोग यांसारख्या कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या इतरही सेवा ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे पुरवल्या आहेत. मात्र, २२ नोव्हेंबर २०१९ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही सविस्तर चर्चा न करता अचानक परिपत्रकाद्वारे या विभागातील कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला प्रखर विरोध झाला होता.
तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून हा आदेश स्थगित केला होता. मात्र, २६ मार्च २०२५ रोजी पुन्हा एकदा कोणताही सध्याचा संदर्भ न देता हेच जुनं परिपत्रक लागू करण्याचा आदेश दिल्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
यासंदर्भात सातारा जिल्हा संघर्ष समितीचे प्रतिनिधी — चंद्रकांत पाटील, अनिल जाधव, स्वप्निल जाधव, दुर्गादास जाधव आणि निलेश सूर्यवंशी — यांनी ११ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे सातारा-सांगली जिल्हा विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट घडवण्यात आली. या भेटीत कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, प्रशासकीय अडचणी, तसेच नागरिकांना संभाव्य आरोग्यधोक्यांविषयी सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर बाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि न्याय देण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
—
#हिवतापविभाग #हत्तीपायकर्मचारी #मलेरिया #डेंगी #शिवसेना #EknathShinde #आरोग्यविभाग #महाराष्ट्रबातम्या #SataraNews #संघर्षसमिती















