आणीबाणीच्या ५० वर्षांनिमित्त मुकुंद तथा नाना पाटणकर यांनी सांगितल्या संघ कार्यकर्त्यांच्या थरारक आठवणी
गुहागर तालुका भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पाटणकर यांचा सत्कार
गुहागर (संदेश कदम, आबलोली ): देशात लागू झालेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुकुंद तथा नाना पाटणकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नाना पाटणकर यांनी आणीबाणीच्या भयावह काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कशाप्रकारे भूमिगत राहून कार्य करत होते, याच्या थरारक आठवणींना उजाळा दिला.
आणीबाणीच्या काळात समाजात प्रचंड भीतीचे वातावरण होते, मात्र संघ कार्यकर्त्यांनी या भीतीवरही मात करत आपले कार्य सुरू ठेवले, असे नाना पाटणकर यांनी सांगितले. त्यांनी गुहागरमधील अनेक कार्यकर्त्यांच्या त्यावेळच्या अनुभवांचे वर्णन केले.
भीतीचे वातावरण आणि संघ कार्यकर्त्यांचा संघर्ष:
नाना पाटणकर यांनी सांगितले की, गुहागरमधील अण्णा दामले, तात्या वझे, मधुकाका परचुरे, केशवकाका भावे, पांडुरंगशेठ तथा दादा शिरगांवकर, दांडेकर सर, अशा सात जणांना ‘मिसा’ कायद्याखाली अटक करण्यात आली होती. तर सुशीलाबाई खरे, प्रमोदकाका सैतवडेकर, शशिनाना बिर्जे यांनी आणीबाणीविरोधात सत्याग्रह केल्यामुळे त्यांनाही अटक झाली होती.
या काळात लोकांमध्ये असलेली दहशत त्यांनी एका प्रसंगातून स्पष्ट केली. पांडुरंगशेठ तथा दादा शिरगांवकर हे चार दिवसांच्या पॅरोलवर सुटून पालशेतला आले होते. त्यांनी अटक झालेल्यांच्या घरी भेटी दिल्या. असोरे येथील पद्माकर निमकर यांच्या घरी गेले असता, मोटरसायकलचा आवाज ऐकून निमकरांच्या घराचे दार बंद झाले होते. दादांनी वहिनींना नेहमीच्या आवाजात हाक मारल्यावरच दार उघडले, पण त्या थरथर कापत ओट्याच्या दारात उभ्या होत्या. ही होती आणीबाणीची दहशत!
संघर्ष आणि चलाखीचे प्रसंग:
मधुकाका परचुरे यांच्याविषयी बोलताना नाना म्हणाले की, अटक होणार हे समजताच मधुकाका पोलीसांचा ससेमिरा चुकवून मुंबईला आपल्या भावाकडे, ग. पां. परचुरे यांच्याकडे गेले. तिथे त्यांना पोलीसांना शरण जाण्याचा सल्ला मिळाला. मात्र, मधुकाकांनी मुंबईत शरण न जाता चलाखीने पुन्हा गुहागर गाठले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दांडेकर सर, जे संघाचे पदाधिकारी होते, त्यांना पोलीसी अत्याचाराची माहिती असूनही विचलित न होता धैर्याने पोलीसांबरोबर गेले, असेही नानांनी सांगितले आरेकरांची कौतुकास्पद भूमिका:
आणीबाणीच्या काळात काँग्रेसचे गुहागरमधील प्रभावी नेते सदाशेठ आरेकर यांची भूमिका कौतुकास्पद होती, असे नानांनी नमूद केले. सदाशेठ यांनी ठरवले असते तर आपल्या विरोधकांना ते धडा शिकवू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. उलट, त्यांनी गुहागर पोलीस ठाण्यात निरोप दिला होता की, “तुम्ही अटक करत असलेली मंडळी ही गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी आहेत. अटक करताना त्यांचा अपमान करू नका आणि कोठडीत त्यांना मारहाण होता कामा नये.”
गुप्तपणे चालणारे जनजागृतीचे कार्य:
आणीबाणीच्या काळात संघ कार्यकर्ते जनजागृतीसाठी सायक्लोस्टाईलवर गुप्तपणे पत्रके काढायचे आणि ती तितक्याच गुप्तपणे वितरित करायचे. गुहागरमध्ये हे मशीन उपलब्ध नव्हते. त्यामुळे दाभोळ खाडीमार्गे दापोलीला जाऊन ते मशीन आणावे लागत असे. त्यासाठी लागणाऱ्या शाईच्या ट्यूब मिळवून, तालुक्यासाठी आवश्यक तेवढ्या पत्रकांची छपाई करून, पुन्हा ते मशीन सुरक्षितपणे दापोलीला पोहोचवायचे. या सर्व कामांमध्ये गुप्तता पाळणे अत्यंत महत्त्वाचे होते.
प्रचारकांचे भूमिगत जीवन:
संघाचे प्रचारक कै. वसंतराव केळकर हे नानांच्या घरी शरद गोखले या नावाने १५ दिवस राहिले होते. त्या काळात अचानक निरोप यायचा की, ‘अमुक ठिकाणी अमुक माणूस उभा आहे, त्याला अमुक ठिकाणी पोहोचवा.’ अशा अचानक येणाऱ्या कामांबरोबरच अटक झालेल्यांच्या घरी संपर्क साधणे, गुप्तपणे चालणाऱ्या शाखांवर प्रवास करणे, तसेच हा कठीण काळही निघून जाईल असा आत्मविश्वास समाजात निर्माण करण्याचे कामही देशातील संघ कार्यकर्ते करत होते.
“आम्ही जे काही केले ते समाजासाठी केले, संघ भावनाने केले,” असे नाना पाटणकर यांनी नम्रपणे सांगितले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष मंगेश रांगळे, माजी नगरसेवक उमेश भोसले, तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष सांगळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष मंदार पालशेतकर आदी उपस्थित होते.
⊗ इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी (Emergency) लागू केली, जी २१ मार्च १९७७ पर्यंत चालू होती.ही आणीबाणी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक वादग्रस्त आणि महत्त्वाचा अध्याय मानला जातो⊕ आणीबाणी लावण्याची कारणे♥ १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची १९७१ सालची निवडणूक अवैध ठरवली.♦ जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी आंदोलनाची तीव्रता वाढली होती.♦ इंदिरा गांधींना राजकीय अस्थिरता आणि वाढती आंदोलने यामुळे देश अस्थिर होईल, अशी भीती वाटली.⊗ आणीबाणीच्या काळातील परिणाम: नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित करण्यात आले. ♦ राजकीय विरोधकांना मोठ्या प्रमाणावर अटक केली गेली. ♦ वृत्तपत्रे आणिप्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लागू केली गेली. ♦ संजय गांधी यांच्या आदेशावर मोठ्या प्रमाणावर बळजबरी नसबंदी आणि झोपडपट्टी हटवण्यासारखे वादग्रस्त निर्णय झाले.⊗ जनतेची प्रतिक्रिया आणि परिणाम: सुरुवातीला काही लोकांनी आणीबाणीचे स्वागत केले असले तरी, हळूहळू त्याविरोधातील असंतोष वाढला. 〈 स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी आणीबाणी चे समर्थन केले होते, असे शिवसेना खा. संजय राऊत यांनी नुकतेच प्रसिद्ध मध्यमा समोर सांगितले होते .〉१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा पराभव झाला.♥ जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले आणि आणीबाणी औपचारिकपणे संपली.एकंदरीत महत्त्व: आणीबाणीने भारतीय लोकशाहीला एक धक्का दिला असला तरी, त्यानंतरच्या निवडणुकांनी आणि जनतेच्या मतदानाने लोकशाहीचे बळ वाढवले. लोकांनी त्यांच्या लोकशाही हक्कांचे महत्त्व ओळखले आणि आणीबाणीचा अनुभव लोकशाही व्यवस्थेच्या सुदृढीकरणाचा आधार ठरल♥ संकलन – श्री. सुजेंद्र चंदा चंद्रकांत सुर्वे – संपादक- रत्नागिरी वार्ताहर -डिजिटल बातमी पत्र |
#आणीबाणी #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #नानापाटणकर #गुहागर #भाजप #आणीबाणी_५०_वर्षे #संघकार्यकर्ता #भूमिगतआंदोलन
