🛑 गुहागरमधील ३५ लाखाच्या विकास कामांना स्थगिती; माजी आमदार डॉ. विनय नातू संतप्त!
मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करून अनुशेष भरून काढण्याचा इशारा
गुहागर.(सुजित सुर्वे-वार्ताहर) गुहागर तालुक्यातील ३५ लाख रुपयांच्या मासेमारी विकास कामाला प्रशासकीय मान्यता असूनही अचानक स्थगिती दिली गेल्यामुळे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करून हा अनुशेष भरून काढण्याचा इशारा दिला आहे.
डॉ. नातू यांनी सांगितले, “गुहागर तालुक्यातील मासेमारी विकासाच्या योजना जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत मंजूर असूनही त्यांना अडथळे आणले जात आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोट्यवधींची कामे चालू असताना गुहागरचे काम थांबवण्यात आले आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.”
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मच्छिमारांची संख्या व मासेमारी उतरवण्याची ठिकाणे पाहता निधीचे योग्य वाटप होणे अपेक्षित आहे.
रत्नागिरी तालुक्यात ३०,००० मच्छिमार व २० मासेमारी ठिकाणे
दापोलीत १४,००० मच्छिमार व ६ ठिकाणे
गुहागरमध्ये १४,००० मच्छिमार व १२ ठिकाणे
राजापूर तालुक्यात १०,००० मच्छिमार
तरीही, जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी रत्नागिरी तालुक्यात ४ कोटी, राजापूरमध्ये सव्वा कोटी, दापोलीत २ कोटी आणि गुहागरला केवळ १ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातही गुहागरमधील ३५ लाखाच्या एका महत्वाच्या कामाला स्थगिती देऊन स्थानिक मच्छिमारांचा हक्क डावलला गेला आहे.
डॉ. नातू म्हणाले, “या अन्यायाविरोधात आम्ही संबंधित मंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन, मत्स्यव्यवसाय विकासाचा अनुशेष भरून काढण्याची मागणी करणार आहोत. सर्व तालुक्यांना समान निधी मिळावा यासाठी माझा प्रयत्न राहील.”
—
#मत्स्यव्यवसाय #गुहागर #रत्नागिरी #डॉ_विनय_नातू #नीतेश_राणे #कोकणविकास #मासेमारी #DevelopmentWork #रत्नागिरीवार्ता #PoliticalNews #कोकण #रत्नागिरीNews #गुहागरNews #PublicInterest #NewsUpdate
