अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण केल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल!
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा सरकारला कडक इशारा
नवीमुंबई (मंगेश जाधव):
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून जाती-जातींत फूट पाडण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. जर हा अन्यायकारक डाव तातडीने थांबवला नाही, तर “रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल”, असा थेट इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
वैभववाडी (सिंधुदुर्ग) येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, अनुसूचित जातींमध्ये फक्त बौद्ध, मातंग एवढ्याच नाहीत तर तब्बल ५९ जातींचा समावेश असून त्यांचे पोटजाती धरल्यास त्या जवळपास १२०० च्या घरात जातात. अशा परिस्थितीत वर्गीकरणातून एक टक्काही फायदा होत नाही. उलट शासन मतांवर डल्ला मारण्यासाठी भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे, असा त्यांचा आरोप होता.
ते पुढे म्हणाले, “खऱ्या अर्थाने समाजाचा विकास हवा असेल तर जातीनिहाय जनगणना करावी. मगच सरकारला प्रत्येक जातीची खरी लोकसंख्या व त्यांच्या विकासाच्या गरजा कळतील.”
या मेळाव्यात रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन कोकण विभाग सचिव मिलिंद जाधव यांनी केले. औचित्य साधून बाळकृष्ण जाधव यांची जिल्हाध्यक्ष आणि अनिल तांबे यांची जिल्हा प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली.
मेळाव्यात कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, खजिनदार महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अशोक कणगोलकर, जिल्हा प्रभारी प्रकाश करूळेकर, चिटणीस मिलिंद जाधव, सुरेश मंचेकर, गोपाळ जाधव, विकास गायकवाड, संतोष साळवी, प्रकाश कासे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संदेश गमरे यांच्यासह रत्नागिरी व लांजा तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
🔖 हॅशटॅग्स
#AnandrajAmbedkar #RepublicanSena #अनुसूचितजाती #सिंधुदुर्ग #वैभववाडी #RatnagiriNews #नवीमुंबईन्यूज #राजकारण #रत्नागिरीवार्ताहर















