राज्यात १,७०० हून अधिक तलाठी पदांची मेगाभरती जाहीर; महसूल सेवकांना राखीव जागा आणि अनुभवानुसार गुण
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी; डिसेंबर अखेरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता
मुंबई -(प्रति निधी), सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात १,७०० हून अधिक तलाठी पदांच्या भरती प्रक्रिया सुरू झाल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जाहीर केले. महसूल सेवकांसाठी तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदांची ही भरती करण्यात येणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माहितीनुसार, ही सर्व रिक्त पदे लवकरच भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही भरती अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी (२०२३) पार पडलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार आणि नियुक्तीविषयक विवाद उद्भवले होते. पेसा क्षेत्रातील उमेदवारांना न्यायालयीन निर्णयानुसार नियुक्ती दिलेली आहे. या संदर्भात पुढील कार्यवाही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महसूल सेवकांची एक प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी मिळावी. या मागणीवर मंत्रालयात बैठक घेण्यात आली, पण वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने, तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवणे आणि अनुभवानुसार अधिक गुण देणे या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली आहे. महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले.
महसूल सेवकांसाठी महत्त्वाचा निर्णय:
महसूल सेवकांची वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी मान्य झाली नसली तरी, त्यांना दिलासा देण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत:
१. तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा.
२. सेवेतील अनुभवानुसार उमेदवारांना अधिक गुण देण्याचा प्रस्ताव.














