महाराष्ट्र वगळता १२ राज्यांमध्ये उद्यापासून विशेष सखोल फेरनिरीक्षण
======———-======
नवी दिल्ली :- उद्या मंगळवार, दि. २८ ऑक्टोबरपासून देशातील १२ राज्यांमध्ये विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) सुरू होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुमार यांनी सांगितले की, एसआयआरचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करण्यात येणार असून, नव्या मतदारांची नोंदणी, तसेच विद्यमान यादीतील त्रुटींची दुरुस्ती केली जाणार आहे. या फेरनिरीक्षणात अंदमान-निकोबार, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्ष्यद्वीप या राज्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील विरोधकांनी एकत्र येत मतदार याद्यांतील घोळ निस्तरण्याची मागणी केली आहे. “जोपर्यंत मतदार यादीतील गोंधळ दूर होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत,” अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली. या भेटीत मनसे प्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते.
१२ राज्यांमध्ये उद्यापासून फेरनिरीक्षण सुरू होत असले तरी महाराष्ट्र त्यात नसल्याने, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्या मतदार याद्यांवरच पार पडतील, हे आता स्पष्ट झाले आहे.
–















