हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी यश ठोंबरे यांची निवड; आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी: नंदकुमार बगाडे पाटील
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली. या बैठकीत श्रीरामपूर येथील यश ठोंबरे यांची अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
निवडणुका स्वबळावर लढणार:
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे म्हणाले की, गेले अनेक वर्षांपासून हिंदू एकता आंदोलन पक्ष महाराष्ट्रातून आपले कार्य करत आहे. युवा तरुण पिढीला आणि महिला भगिनींना पक्षाच्या कार्यामध्ये संधी देण्यात येणार आहे. येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हिंदुस्तानी एकता पार्टी कोणत्याही पक्षाशी युती न करता, स्वबळावर लढवणार आहे. तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षात समाविष्ट करून त्यांना निवडणुकीत संधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्याय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होऊन काम करण्याचे आवाहन शितोळे यांनी केले.
यश ठोंबरे यांच्याकडे जिल्हा सरचिटणीसपदाची धुरा:
यावेळी श्रीरामपूर येथील युवा कार्यकर्ते यश ठोंबरे यांची अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मागणी:
या बैठकीत विविध शासकीय योजनांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पंचनामा न करता, कुठलेही निकष न लावता तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी लेखी मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा अधिक बळकट करण्यासाठी लवकरच जिल्ह्यात एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही प्रदेशाध्यक्षांनी दिली.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा सचिव नंदकुमार बागडे पाटील, बी.एम. पवार, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव फोपसे, मनोहर बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष मंगेश शेत्रवाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर सूत्रसंचालन नंदकुमार बागडे पाटील यांनी केले.















