धक्कादायक : ८० वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्यापत्रातून जमीन व्यवहारातील ४० लाखांच्या फसवणुकीचा आरोप
संदेश कदम व अमोल गुरव यांना दापोली पोलिसांची अटक; गुन्हा रजि. नं. २०१/२०२५ अंतर्गत कारवाई
दापोली (जि. रत्नागिरी) : हर्णे-राजवाडी येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. सुरुवातीला दापोली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद (अ.मू.र.नं. ७४/२०२५) मयताचे नातू कौशिक संजय दुबळे (वय २५) यांच्या खबरीवरून करण्यात आली होती. मात्र, प्राथमिक तपासादरम्यान या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.
पोलिसांनी घराची झडती घेताना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी हस्तगत केली. तपासात ती चिठ्ठी मयताच्या स्वहस्ताक्षरातील असल्याचे निष्पन्न झाले. चिठ्ठीत जयंत दुबळे यांनी जमीन व्यवहारातील मोठ्या आर्थिक फसवणुकीनंतर झालेल्या मानसिक तणावामुळे जीवन संपवल्याचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे.
या चिठ्ठीत संदेश शंकर कदम (वय ४८, सध्या रा. जालगाव बर्वेवाडी, मूळ रा. हर्णे-राजवाडी) आणि अमोल भालचंद्र गुरव (वय ३९, रा. मोठी गोडी बाव, हर्णे, ता. दापोली) या दोघांचे नाव नमूद आहे. जमीन व्यवहारातून मिळणारे ४० लाख रुपये परत न मिळाल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही लिहिले आहे.
या चिठ्ठीवरील माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी सखोल तपास सुरू करत दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा रजि. नं. २०१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८ व ३(५) लावण्यात आले. हा गुन्हा १ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २.४१ वाजता नोंदवण्यात आला असून, दोघांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.















