📰 विक्रांत जाधवांना विकासावर बोलण्याचा सल्ला – निराधार आरोपांवर गृहराज्यमंत्री कदमांची टीका
🔸 “स्वतःची बदनामी करून घेतली, आता दुसऱ्याची बदनामी नको” – योगेशदादा कदमांचा टोला
चिपळूण : महायुतीच्या बैठकीनिमित्त अभिषेक हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा मंडणगड-दापोली-खेड मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी विक्रांत जाधव यांना थेट इशारा दिला.
“भास्कर जाधव हे विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मुलांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. विक्रांत जाधव यांनी विकासावर बोलावे. स्वतःची बदनामी करून घेतली, आता दुसऱ्याची बदनामी करण्यात समाधान मानू नये,” असा कठोर टोला कदम यांनी लगावला.
कदम पुढे म्हणाले, “विक्रांत जाधव यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. पोलिस आपले काम स्वतंत्रपणे करत आहेत. कोणतीही नावे वगळण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. या प्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल.”
🏛️ खेड नगराध्यक्ष पदावरील चर्चा
खेड नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवारीविषयी बोलताना कदम म्हणाले, “वैभव खेडेकर यांनी उमेदवार असल्याचा स्टेटस ठेवला आहे. कोण काय स्टेटस ठेवतो, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. महायुती योग्य वेळी निर्णय घेईल. वैभव खेडेकर हे महायुतीत आहेत, म्हणून सध्या त्यांच्यावर भाष्य करणार नाही.”
सूर्यकांत दळवी यांनी दाखवलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “खेड शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.”
यानंतर त्यांनी वैभव खेडेकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या दाव्यावर शंका उपस्थित केली. “ते स्वतः विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीत, मात्र नगराध्यक्ष म्हणून कोणाला निवडून आणू शकतात, असे सांगतात. जर ते वैभव खेडेकर यांना निवडून आणू शकत असतील, तर त्यांना आमच्या शुभेच्छा,” असे कदम म्हणाले.
या वेळी शशिकांत चव्हाण, उमेश सकपाळ, संदेश आयरे, सुयोग चव्हाण, निहार कोवळे आदी उपस्थित होते.















