खेरशेत येथे यशोधरा महिला मंडळाच्यावतीने तक्षशिला बुद्ध विहारात संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम)
भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण झाले असून त्याचे औचित्य साधून यशोधरा महिला मंडळ,खेरशेत (ता.चिपळूण) या स्थानिक महिला संघटनेच्या वतीने तक्षशिला बुद्धविहार, खेरशेत येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाले आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात आवर्जून म्हणायचे. त्यांनी प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून ती स्वावलंबी बनावी. ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, यासाठी विविध कायद्याद्वारे तीला सनदशीर रित्या हक्क, अधिकार प्राप्त करून दिले.आजची स्त्री स्वतःच्या हक्काबद्दल सजग आहे, जागरूक आहे हे केवळ स्त्रीउद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळेच हे शक्य झाले आहे. यांचे पुण्यस्मरण म्हणून २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या माध्यमातून यशोधरा महिला मंडळ, खेरशेत (ता.चिपळूण) या स्थानिक महिला संघटनेच्या वतीने तक्षशिला बुद्धविहार,खेरशेत येथे संविधान जागर आणि संविधान सन्मानदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्षा उपासिका शैला बाळाजी कदम यांनी तर भारतीय संविधानाच्या प्रतिमेला ज्येष्ठ उपासिका जयश्री कदम यांनी पुष्पहार अर्पण करून समाजाप्रती आदरांजली वाहिली. प्रसंगी उपासिका मनाली कदम (आशा सेविका) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाचे महत्त्व विषद केले. त्यानंतर उपासिका संघरक्षिता कदम (अंगणवाडी सेविका) यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन केले.
यशोधरा महिला मंडळ, खेरशेत गेली दोन वर्ष विश्वरत्न भगवान बुद्ध व विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची एकदिवसीय स्वतंत्रपणे महिला मंडळाच्यावतीने संयुक्त जयंती महोत्सव साजरा केला जातो.तर दुसऱ्या दिवशी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, गावशाखा ,खेरशेत संघटनेच्या माध्यमातून संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो.केवळ महिलांनी एकत्रित येऊन या दोन महामानवांचा जयंती महोत्सव साजरा करणे हा तालुका, जिल्हा,राज्यासमोर आदर्श ठेवला गेला आहे.
सदर कार्यक्रम संपन्न करण्याकरिता सर्वस्वी उपासिका प्रज्ञा कदम (उपाध्यक्षा), करुणा कदम (संदेश वाहक), श्रीमती अनिता कदम, प्रियांका कदम, प्रार्थना मोहिते, मंदा कासारे, प्रणाली कदम, वैशाली कदम आणि कु.सृष्टी कदम यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या अनुषंगाने संपन्न झालेल्या या संविधान दिनाबद्दल या भीमअनुयायी मायमाऊलींचे मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी भ्रमणध्वनीवरून आभार मानून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या.















