धक्कादायक! सीसीटीव्ही प्रकल्पात मोठा घोटाळा; खासगी कंपनीकडून ४३.३५ लाखांची फसवणूक
रत्नागिरी शहरातील पाळत ठेवणारा प्रकल्प रखडला; प्रोटोकॉल वन आयटी लॅब्सच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरात पाळत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सीसीटीव्ही प्रकल्पात मोठा आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकल्पाची देखभाल व कार्यान्वयन करण्याची जबाबदारी असलेल्या प्रोटोकॉल वन आयटी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाची तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत गोपाळ थवानी आणि कुलदीप एराम (संचालक, प्रोटोकॉल वन आयटी लॅब्स प्रा. लि.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या “शहर पाळत ठेवणारा प्रकल्पा” अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेर्यांची देखभाल, दुरुस्ती आणि सातत्याने कार्यरत ठेवणे ही जबाबदारी संबंधित कंपनीवर होती. मात्र, कंपनीच्या संचालकांनी अटी व शर्तींचा भंग करत कॅमेरे बंद ठेवले, तसेच पुरवठा आदेशानुसार कामाची पूर्तता न करता शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक उमेश आव्हाड (वय ४६, रा. शंकेश्वर मधूबन हाऊसिंग सोसायटी, माळनाका – रत्नागिरी), पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे दोन्ही संचालकांविरुद्ध शासनाची फसवणूक व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.














