तवसाळ येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप
९ जानेवारीपासून चिपळूणमध्ये आमरण उपोषणाचा इशारा
♦ आशोका बिल्डकॉनकडून आंबा बाग उद्ध्वस्त; महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधातही आंदोलन. शिवस्वराज्य शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष मंदार मुकुंद रहाटे यांनी दिला आहे.
गुहागर – (सुजित सुर्वे ) प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील मौजे तवसाळ येथील शेतकरी उमेश नंदकुमार सुर्वे यांच्या जमिनीवर परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम करून पारंपरिक आंबा व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप करत शिवस्वराज्य शेतकरी संघटनेने ९ जानेवारी २०२६ पासून चिपळूण येथे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
तसेच गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अनागोंदी, निष्काळजी व जनविरोधी कारभाराविरोधात आबलोली महावितरण कार्यालयासमोरही उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.
आंबा बाग नष्ट; शेतकरी कुटुंब उपासमारीच्या मार्गावर
शेतकरी उमेश सुर्वे यांच्या मालकीची सर्वे नं. २६/२ व २६/४ ही सामाईक जमीन असून या ठिकाणी ८५ आंबा कलमे असलेली नोंदणीकृत बाग (७/१२ उताऱ्यावर नोंद) होती. या बागेवर महाराष्ट्र ग्रामीण बँक, आबलोली शाखेचे KCC कृषी कर्जही आहे.
असे असताना आशोका बिल्डकॉन कंपनीने कोणतीही परवानगी न घेता जबरदस्तीने ऑफिस, लेबर कॉलनी व काँक्रीट प्लांट उभारून संपूर्ण जमिनीला कंपाऊंड केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
यामुळे पारंपरिक आंबा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून संबंधित शेतकरी कुटुंब उपासमारीच्या मार्गावर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांना जमिनीत प्रवेश नाकारला
कंपनी पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीत प्रवेश देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी
- ३० ऑक्टोबर २०२५ रोजी वकिलामार्फत नोटीस,
- २० डिसेंबर २०२५ रोजी लेखी तक्रार
देऊनही शासन व कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
महावितरणविरोधात तीव्र संताप
याचबरोबर गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधातही शिवस्वराज्य शेतकरी संघ आक्रमक झाला आहे.
संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —
- स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिल; मीटरसाठी ८–१० हजार रुपयांचा खर्च अन्यायकारक
- आबलोली सब-स्टेशनचे अधिकारी कायम अनुपस्थित
- अनेक गावांतील विजेचे पोल जंगलेल्या व कोसळण्याच्या अवस्थेत
- वीजपुरवठा खंडित झाल्यास २–२ दिवस वीज न येण्याची समस्या
- आबलोली बाजारपेठेतील धोकादायक पोल व कमी उंचीवरील तारा तातडीने बदलण्याची गरज
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी आबलोली येथे कंटेनरच्या धडकेत पोल व तारा रस्त्यावर कोसळूनही अधिकारी वेळेवर न आल्याने रस्ता तासन्तास बंद राहिला, सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
मुख्य मागण्या
- तात्काळ बेकायदेशीर बांधकाम हटवावे
- उद्ध्वस्त आंबा बागेची नुकसानभरपाई द्यावी
- जमिनीचा योग्य मोबदला मिळावा
- जीर्ण पोल, डीपी व वायर बदलून केबल लाईन टाकावी
मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच राहणार
मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच राहील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व महावितरण अधिकाऱ्यांची राहील, असा ठाम इशारा
शिवस्वराज्य शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष मंदार मुकुंद रहाटे यांनी दिला आहे.
















