पाटपन्हाळे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा महिला मुक्ति दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई याच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील सावित्रीच्या लेकींनी आपली मनोगते व्यक्त केली त्यामध्ये कु. किशोरी बोटके (प्रथम वर्ष वाणिज्य) हीने आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा तसेच त्यांच्या निधनापर्यतचा आढावा घेतला. तृतीय वर्ष कला वर्गातील कु. अदिती कुलकर्णी हीने आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई या खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या, राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी शिक्षणाची सुरु केलेली चळवळ सावित्रीबाई फुले यांनी आठरापगड जातीतील महिलाना सुशिक्षित करत अतिशय कठीण काळात कठीण परिस्थितीत पुढे नेली. त्यामुळेच मी स्वतः येथे उभी राहून तुमच्या समोर बोलत आहे. नाहीतर आम्हा महिलांची अवस्था आजही अगदी वाईट असती. आजची स्त्री उच्च शिक्षित झाली आणि उच्चपदावर नोकरी करीत आहे. एवढेच नव्हे तर आज आपल्या देशाचे सर्वात उच्चपद राष्ट्रपति पदावर एक आदिवासी महिला आहे हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच. सावित्रीबाई फुले याच्या विचारांची शिदोरी आपण प्रत्येकाने पुढे नेली पाहिजे असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिसूर्य जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य सांगून आजच्या काळातील विविध क्षेत्रातील महिलांचे अस्तित्व त्याचे महत्व पटवून सांगितले. आजच्या तरुण-तरुणींनी मोबाइल व टी. व्ही. थोडा दूर ठेवला पाहिजे. रोज एखादे चांगले पुस्तक वाचले पाहिजे. आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयाचा जास्तीतजास्त उपयोग केला पाहिजे. आपल्या पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले असे होईल असे सांगितले.
सदर कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. सौम्या चौघुले, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथालय परिचर श्री. पर्शुराम चव्हाण व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौम्या चौघुले यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रा. चैत्राली झिंबर यांनी मानले.















