लहान वयात स्पर्धेत सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचे स्पर्धाविश्व विस्तारित होते : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविण दवणे
खंडाळा येथे ग्रामविकास मंडळ व शिक्षणप्रेमी मंडळी यांच्या माध्यमातून केंद्रस्तरीय विद्यार्थी गुणवत्ता विषयक विविध स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

रत्नागिरी:- निलेश रहाटे
विद्यार्थी जीवनात लहान वयात विविध स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. या वयात स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचा स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्पर्धेच्या युगात अशा स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थी वावरला पाहिजे यासाठी तशा संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कारण लहान वयात स्पर्धेत सहभागी झाल्यानेच त्यांचे स्पर्धा विश्व विस्तारित होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रविण दवणे यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे आणि वाटद केंद्रातील वाटद केंद्रस्तरीय शिक्षणप्रेमी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य स्व. ह. भ. प. दत्तात्रय बिवलकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कुल खंडाळा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करण्याचा ग्रामविकास मंडळ आणि वाटद केंद्रस्तरीय शिक्षणप्रेमी मंडळाचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात चालणाऱ्या स्पर्धेबाबत जागरूकता निर्माण होईल. आजच्या काळात अत्यंत जलदगतीने आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आमिषे त्यांच्या मार्गावरून दूर करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. अशावेळी पालकांनी सजग राहिले पाहिजे. ग्रामविकास मंडळ आणि शिक्षणप्रेमी मंडळी यांनी विद्यार्थी विकासासाठी राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूरक ठरत असतात. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अत्यंत मोलाचा असतो. या स्पर्धामधील बक्षिसे ही या आनंदात भर घालणारी असतात.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे रत्नागिरीमधील ज्येष्ठ व अभ्यासू विधिज्ञ ऍड. अविनाश तथा भाऊ शेट्ये यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी प्रत्येक शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या उपक्रमात परिसरातील शाळा सहभागी होणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांसाठी आयोजकांच्या वतीने सुरु केलेला हा उपक्रम उपयुक्त आहे.
या उपक्रमाला गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांनीही या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सातत्याने वाटद शिक्षणप्रेमी मंडळी विद्यार्थ्यांसाठी करत असलेले उपक्रम हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे निरीक्षण नोंदविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विष्णुदत्त निमकर यांनीही उपक्रमाला शुभेच्छा देताना भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष व स्पर्धेचे उद्घाटक डॉ. मधुसूदन वैद्य, शाळा विकास समितीचे अध्यक्ष बाळशेठ जोग यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आयोजकांच्या कल्पकतेचे कौतुक करून आयोजनात नेहमीच सहकार्य करण्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाटद शिक्षणप्रेमी मंडळाचे प्रतिनिधी उदय रहाटे यांनी करताना स्पर्धेचा उद्देश आणि महत्व सांगून विद्यार्थीहित लक्षात घेऊन सर्वांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत वाचन, हस्ताक्षर, स्तोत्र पाठांतर, स्मरण, पाढे पाठांतर आणि विज्ञान रंजन प्रश्नमंजुषा स्पर्धा ह्या सहा स्पर्धांचे आयोजन गट क्रमांक १ ( इयत्ता पहिली ते दुसरी), गट क्रमांक २ ( इयत्ता तिसरी ते चौथी), गट क्रमांक ३ ( इयत्ता पाचवी) आणि गट क्रमांक ४ ( इयत्ता सहावी ते सातवी) अशा चार गटात करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण तन्मय गोरे, तेजस निमकर यांच्यासह श्रावणी नांदिवडेकर, वैशाली कोळी, पुनम कुलकर्णी, मंजुश्री पाटील, राधा नारायणकर, अंकुश साटले, मनोहर इनामे आणि माधव अंकलगे यांनी केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण प्रसंगी वाटद मिरवणे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अमित वाडकर, प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मनोज तथा बबलुशेठ विचारे, सामाजिक कार्यकर्ते संतोषशेठ निंबाळकर, लोकनेते शामराव पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय शितप, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सावंत, मा. प्रज्ञा दवणे, ग्रामविकास मंडळाचे सचिव सुधाकर शिर्के, मुख्याध्यापिका अश्विनी पवार यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णुदत्त निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन वैद्य, शाळा समितीचे अध्यक्ष बाळशेठ जोग, शेखर भडसावळे, उदय रहाटे, विश्वनाथ शिर्के, खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक आशिष वासावे, सर्व शिक्षक, कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी सहकार्य केले.
ग्रामविकास मंडळ आणि शिक्षणप्रेमी मंडळी यांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.















